Marathi e-Batmya

मुंबई विद्यापीठाच्या ५००० हजार विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रश्नी छात्रभारतीचे आंदोलन

मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॕम्पस मध्ये छत्रपती शिवाजी भवन समोर कुलगुरुंची गाडी अडवून इंजिनिअरिंग ५००० विद्यार्थ्यांना चालू शैक्षणिक वर्षात कॕरी आॕन अंतर्गत विशेष संधी देण्यासाठी मागच्या ४ महिन्यांपासून टाळाटाळ करणाऱ्याच्या मुद्यावरुन आज कुलगुरु व प्र- कुलगुरुंना घेराव घालत जाब विचारण्याचा प्रयत्न केला.

मुंबई विद्यापीठाच्या अभियांत्रिकी विद्याशाखेतील प्रथम वर्षामध्ये अनुत्तीर्ण असणाऱ्या विद्यार्थ्यांना तृतीय वर्षाच्या पाचव्या सत्राकरिता किंवा द्वितीय वर्षामध्ये अनुत्तीर्ण असणाऱ्या विद्यार्थ्यांना चतुर्थ वर्षाच्या सातव्या सत्राकरिता Carry on अंतर्गत विशेष संधी नसल्यामुळे जवळपास ५००० विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येत नाही.

महाराष्ट्रात चालू शैक्षणिक वर्षासाठी पुणे विद्यापीठ/कोल्हापूर विद्यापीठ/अमरावती विद्यापीठ/सोलापूर विद्यापीठ/नागपूर विद्यापीठ यांनी विद्यार्थ्यांना Carry On अंतर्गत विशेष संधी दिली आहे. मागच्या वर्षी मुंबई विद्यापीठाने परिपत्रक क्र.आरइजी/आयसीसी/२०२३-२४/७ द्वारे अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना विशेष संधी दिली होती.

आपल्यावर अन्याय होत आहे ही भावना व अंतिम वर्षात प्रवेश मिळत नाही ही भिती यामुळे विद्यार्थी प्रचंड मानसिक दडपणाखाली येत आहेत. याचा विपरीत परिणाम घरातील कौटुंबिक परिस्थिती बिघडण्यावर होत असून आजच्या स्पर्धेच्या जगात एक वर्ष वाया जाईल या भितीमुळे काही विद्यार्थी डिप्रेशन मध्ये ढकलले जात आहेत.

कुलसचिव, प्र कुलगुरु, कुलगुरु यांच्यासोबत अनेकदा बैठक होऊनही काही ठोस उत्तर देण्यात आलेले नाही. यापुढे मा. कुलगुरुंच्या सर्व जाहीर कार्यक्रमांमध्ये छात्रभारती निषेध नोंदवणार असे छात्रभारतीचे अध्यक्ष रोहित ढाले यांनी सांगितले

यावेळेस २०० आंदोलक विद्यार्थी आणि छात्र भारतीचे अध्यक्ष रोहित ढाले यांच्यासह सचिन बनसोडे, सचिन काकड, विकास पटेकर, चेतन पाटील आणि विशाल कदम उपस्थित होते.

Exit mobile version