Marathi e-Batmya

विरार आगीच्या चौकशीचे आदेश देत मृतक-जखमींसाठी मदत जाहिर

मुंबई: प्रतिनिधी

विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयातील अतिदक्षता विभागास आग लागून काही रुग्णांचा मृत्यू झाल्याप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले असून उपचार घेत असलेल्या इतर रुग्णांना झळ पोहचू नये तसेच त्यांची लगेचच इतरत्र व्यवस्था करावी असे निर्देश दिले. आगीची घटना कळल्यानंतर मुख्यमंत्री स्वतः संबंधित अधिकाऱ्यांशी बोलले असून त्यांनी सर्वप्रथम प्राधान्याने आग पूर्णपणे विझवणे आणि इतर रुग्णांवरील उपचार सुरू राहतील याकडे लक्ष देण्यास सांगत या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिले.

ही आग कशामुळे लागली याचा योग्य तो तपास करावा. हे खासगी रुग्णालय आहे, याठिकाणी अग्नी सुरक्षेची पुरेशी काळजी घेतली होती किंवा नाही हे पाहून तातडीने योग्य ती चौकशी करण्याचे निर्देशही त्यांनी प्रशासनाला दिले. विरार रुग्णालय आगीतील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख आणि गंभीर जखमींना १ लाख रूपयांची मदतही मुख्यमंत्र्यांनी यावेळी जाहिर केली.

Exit mobile version