Marathi e-Batmya

मंत्रालयातल्या अधिकाऱ्यांनो गावी आहात तर जिल्हाधिकारी-पोलिसांशी संपर्क साधा

मुंबई: प्रतिनिधी
राज्यातील लॉकडाऊनची मुदत दुसऱ्यांदा वाढविण्याआधीच मंत्रालयातील अनेक अधिकारी आपल्या मूळ गावी किंवा नातेवाईकांच्या गावी गेलेले आहेत. अशा गावी गेलेल्या सर्व अधिकाऱ्यांनी तात्काळ मंत्रालयात हजर होण्यासाठी संबधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी किंवा पोलिस अधिक्षकांशी संपर्क साधून मंत्रालयातील आपल्या जागेवर रूजू व्हावे असे आदेश राज्य सरकारने सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांना बजावले आहेत.
कोरोना आजाराचा प्रादुर्भाव रोखण्याच्या उद्देशाने केंद्र व राज्य सरकारने १४ एप्रिल पर्यत लॉकडाऊन जाहीर केला. त्यावेळी अनेक अधिकारी आपल्या कुटुंब कबिल्यासह गड्या आपला गावच बरा म्हणून कोणतीही सूचना न देता मुंबईतून गावाकडे जावून राहणे पसंत केले. मात्र आता लॉकडाऊनच्या दुसऱ्या टप्प्यात सर्व कामकाज मुळ पदावर आणण्यासाठी ३५ टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत रोटेशन पध्दतीने कामकाज पुन्हा सुरळीत चालविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्यानुसार सर्व विभागांना यासंबधीचे आदेश राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने दिले.
त्यानुसार सर्व विभागांनी आपापल्या विभागातील अधिकाऱ्यांना आदेश बजावित गावी गेलेल्या अधिकाऱ्यांनी तात्काळ जिल्हाधिकाऱ्यांशी किंवा पोलिस अधिक्षकांशी संपर्क साधून गाव सोडण्याचे आदेश दिले आहेत.

New Doc 2020-04-17 14.54.12 (हेच ते कार्यालयीन आदेश)

 

Exit mobile version