Marathi e-Batmya

खेळाच्या मैदानावरील दांडीया संकटात

मुंबईः प्रतिनिधी
शहरात मुलांसाठी खेळाची मैदाने मोठ्या मुश्किलीने उपलब्ध होत असताना नवरात्रोत्सवाचे निमित्त पुढे करत राज्य सरकारने ही मैदाने दांडियासाठी उपलब्ध करून देण्याचे धोरण स्विकारले आहे. त्यामुळे मुलांवर खेळापासून वंचित राहण्याची पाळी आहे. या धोरणाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात पत्रकार विनायक सानप यांनी जनहित याचिका दाखल केली असून क्रिडा विभागाला आपली भूमिका मांडण्यास सांगण्यात आले. त्यामुळे फाल्गुनी पाठक सारख्या दांडिया गायिकांच्या कार्यक्रमांच्या बाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
बोरीवलीतील मुलांसाठी असलेल्या खेळाच्या मैदानावर दांडिया आणि गायिका फाल्गुनी पाठकच्या कार्यक्रमासाठी देण्यात आली. त्यामुळे मुलांसाठी खेळाचे मैदान बंद होणार आहे. या कालावधीत खेळाच्या मैदानाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार आहे. यामुळे खेळाच्या मैदानावर दांडियास मान्यता देण्यात येवू नये यासाठी पत्रकार सानप यांनी न्यायालयात धाव घेतली. त्यावर उच्च न्यायालयाचे न्यायधीश बी.आर.गवई, एम.एस. कर्णिक यांच्या खंडपीठासमोर सोमवारी ८ ऑक्टोंबर रोजी सुनावणी झाली. त्यावेळी खेळाची मैदाने दांडियासाठी देण्याबाबत राज्य सरकारच्या अखत्यारीत असलेल्या क्रिडा विभागाचे काय धोरण आहे अशी विचारणी केली. तसेच याप्रश्नी क्रिडा विभागाने आपले म्हणणे न्यायालयासमोर सादर करावे असे आदेशही दिले. त्यामुळे खेळाच्या मैदानावरील दांडिया उत्सवाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Exit mobile version