Marathi e-Batmya

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे बीआयटी चाळीतील निवासस्थान राष्ट्रीय स्मारक बनविणार

मुंबई: प्रतिनिधी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे परळ दामोदर हॉलजवळील बीआयटी चाळ येथील इमारतीत दुसऱ्या माळ्यावर राहायचे. 1912 ते 1934 या 22 वर्षे कालावधीत त्यांचे येथे वास्तव्य होते. हे निवासस्थान राष्ट्रीय स्मारक म्हणून विकसित करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चैत्यभूमी दादर येथे केली.
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 63व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चैत्यभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, मंत्री जयंत पाटील, सुभाष देसाई, बाळासाहेब थोरात, खासदार राहूल शेवाळे, आमदार जितेंद्र आव्हाड, आदित्य ठाकरे, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, महापालिका आयुक्त प्रविण परदेशी आदि उपस्थित होते.
यावेळी राज्यपाल म्हणाले, आपण सर्व मिळून बाबासाहेबांच्या स्वप्नातील भारत बनवण्याचा प्रयत्न करुया. बाबासाहेबांचे विचार अनेक पिढ्यांना प्रेरणादायी आहेत. त्यांनी संविधानाच्या माध्यमातून देश एकसंघ ठेवण्याचा प्रयत्न केला. संपूर्ण देश त्यांना आज अभिवादन करीत आहे. मी ही त्यांना विनम्र अभिवादन करित आहे, अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

Exit mobile version