“महाराष्ट्रातील प्रत्येक घरावर आनंदाची, प्रगतीची आणि विकासाची गुढी अभिमानाने उभारली पाहिजे, हीच आमची भूमिका आहे. शेतकरी, कष्टकरी, तरुण आणि माता-भगिनी यांच्या जीवनात आशेचा नवा किरण निर्माण करून त्यांना यशाच्या उंच शिखरावर नेणे, हा आमचा संकल्प आहे. सामान्य माणसाच्या स्वप्नांना बळ देत त्याच्या आयुष्यात स्थैर्य, समृद्धी आणि आत्मविश्वासाची नवी पहाट उगवावी, यासाठी शासन सातत्याने कार्यरत राहील,” असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
गुढीपाडव्याच्या मंगलमय पर्वानिमित्त ठाणे शहरात सांस्कृतिक तेज, परंपरेचा अभिमान आणि सामाजिक एकोप्याचा अद्भुत संगम अनुभवायला मिळाला. कोपिनेश्वर मंदिर नववर्ष स्वागत समितीच्यावतीने आयोजित करण्यात आलेली भव्य नववर्ष स्वागत शोभायात्रा ही ठाणेकरांच्या सांस्कृतिक अस्मितेचा जिवंत उत्सव ठरली.ढोल-ताशांच्या गजरात, भगव्या पताकांच्या लयीत आणि पारंपरिक वेशभूषेच्या देखण्या साजात सजलेले नागरिक मोठ्या उत्साहात या शोभायात्रेत सहभागी झाले होते.
घराघरांवर उभारलेल्या गुढ्या, फुलांचा दरवळ, चैतन्याने भारलेले वातावरण आणि रस्त्यांवर उमटणारा जल्लोष या सर्वांनी ठाण्याचा सांस्कृतिक माहोल अधिकच खुलवला.
शहरातील विविध सामाजिक संस्था, शाळा, बँका आणि सांस्कृतिक मंडळांनी सादर केलेले आकर्षक व आशयघन चित्ररथ हे या शोभायात्रेचे प्रमुख आकर्षण ठरले. पर्यावरण संवर्धन, अवयवदान, आयुर्वेदाचे महत्त्व, संतुलित आहार आणि मानसिक आरोग्य यांसारख्या विषयांवर प्रभावी संदेश देत या चित्ररथांनी समाजमनाला जागृत केले. प्रत्येक चित्ररथ हा सामाजिक जाणिवांचा संदेशवाहक ठरत होता.
याशिवाय, लहानग्यांनी सादर केलेल्या मल्लखांब आणि विविध शारीरिक कसरतींच्या नेत्रदीपक प्रात्यक्षिकांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
पारंपरिक कलेचा आणि नव्या पिढीच्या ऊर्जेचा असा सुंदर संगम या शोभायात्रेत अनुभवायला मिळाला. ठिकठिकाणी नागरिकांनी एकमेकांना शुभेच्छा देत, संवाद साधत आणि आनंदोत्सव साजरा करत गुढीपाडव्याच्या सणाचा गोडवा अधिकच वाढवला.
ठाण्यातील गुढीपाडव्याची ही शोभायात्रा केवळ परंपरेचा भाग नसून स्वर्गीय आनंद दिघे यांनी दिलेल्या सांस्कृतिक वारशाची जपणूक करणारा आणि अधिक व्यापक स्वरूपात पुढे नेणारा उत्सव ठरत असल्याकडे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी लक्ष वेधले.
दरवर्षीप्रमाणे यंदाही या सोहळ्याने ठाणे शहरात उत्साह, अभिमान आणि सांस्कृतिक ऐक्याची नवी ऊर्जा निर्माण केली.
नववर्षाच्या या मंगलदिनी ठाणे शहराने केवळ सण साजरा केला नाही, तर परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर सेतू उभारला. सांस्कृतिक वैभव जपत समाजप्रबोधनाचा संदेश देणारी ही शोभायात्रा ठाणेकरांच्या एकजुटीची आणि सकारात्मकतेची जिवंत साक्ष ठरली.
एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, प्रत्येकाच्या मनात नव्या आशा, नव्या संकल्पांची पालवी फुटावी आणि येणारे वर्ष सर्वांसाठी यश, समाधान आणि समृद्धी घेऊन यावे, अशी भावना व्यक्त केली. तसेच गुढीपाडव्याच्या या सांस्कृतिक सोहळ्याने ठाणे शहराला नवचैतन्याची प्रेरणा देत नववर्षाचे स्वागत अधिक अर्थपूर्ण आणि संस्मरणीय केले.
या सांस्कृतिक जल्लोषात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के, आमदार संजय केळकर, महापौर शर्मिला पिंपळोलकर, उपमहापौर कृष्णा पाटील तसेच आयुक्त सौरभ राव यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि असंख्य ठाणेकर नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
ठाण्यातील टेंभी नाक्यावरील आनंद आश्रमात देखील साजरा झाला गुढीपाडवा
ठाणे शहरातील स्वर्गीय आनंद दिघे यांच्या वास्तव्याने पुनित झालेल्या आनंदआश्रमात देखील गुढीपाडवा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. परंपरेनुसार आनंद आश्रमाच्या दरवाजापाशी गुढी उभारण्यात आली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गुढीचे पूजन करण्यात आले. यानंतर आनंद आश्रमातील स्वर्गीय गुरुवर्य आनंद दिघे यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी ठाणे विधानसभा प्रमुख हेमंत पवार, माजी परिवहन सभापती विलास जोशी, शिवसेना गटनेते पवन कदम आणि शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
