Marathi e-Batmya

मंत्रालयातील संरक्षित जाळीवर तरुणाचे अनोखे आंदोलन

पोलिसांची तारांबळ उडाली

मुंबई : प्रतिनिधी

मंत्रालयात विषप्राषन करून शेतकरी धर्मा पाटील यांनी आत्महत्या केल्याचं प्रकरण आता कुठे निवळत असताना पुन्हा एकदा मंत्रालयात एका तरुणाने  चक्क  मंत्रालयाच्या दुसऱ्या मजल्यावर  बांधण्यात आलेल्या  संरक्षक जाळीवर बसून  अनोखे आंदोलन केले. यामुळे  मात्र पोलिसांची एकच  तारांबळ उडाली. लक्ष्मण अण्णा साहेब चव्हाण (वय ४०)  राहणार कोथरूड.(पुणे ) असे या तरुणाचे नाव असून प्रजासत्ताक भारत पक्षाचा तो अध्यक्ष आहे. आज (दि.७) दुपारच्या सुमारास  सदर  घटना घडली आहे.

आपल्या विविध मागण्या घेवून  लक्ष्मण चव्हाण हा तरुण दुपारी  मंत्रालयात आला. अनेक मंत्री कार्यालयाला सोबत आणलेले निवेदन दिल्यानंतर अचानक  दुसऱ्या मजल्यावर बांधण्यात आलेल्या संरक्षक जाळीवर तो चढला अन आपल्या हातात असलेले बॅनर त्यांनी सुरुवातीला फडकविले. त्यानंतर प्रजासत्ताक भारत पक्ष नाव असलेल्या पत्रकं त्यांनी वरून खाली फेकली. प्रामुख्याने  शेतकरी कुपोषण, बाल माता यांचा मृत्यू थांबत नाही तो पर्यत  आमदार आणि मंत्र्यांनी आपल्या सर्व सरकारी सुविधांचा त्याग करावा. आदी मागण्या यांनी केल्या आहेत.

  त्याने अचानक केलेल्या या अनोख्या आंदोलनामुळे मात्र पोलिसांची चांगलीच भंबेरी उडाली. शेवटी या जाळीवर  पोलीस हवालदार बाबासाहेब रणखांबे आणि वनखात्याचा वाहन चालक राजेश नामदास यांनी झेप घेवून त्या तरुणाला पकडण्याचा प्रयत्न केला. पण काही मिनिटं तो घरंगळत जाळीवर इकडे तिकडे  पळत होता. परंतु त्याला पकडण्यासाठी गेलेल्या या दोन कर्मचाऱ्यांनी शिताफीने  त्याला  पकडले.  या घटनेमुळे मंत्रालयात काही वेळासाठी गोंधळाचं वातावरण होतं, पण थोड्याच वेळात अग्निशमन दलाचे जवान आणि पोलिसांच्या मदतीनं या तरुणाला जाळीवरुन सुरक्षित खाली उतरवण्यात आलं आहे. सध्या त्याच्याकडे चौकशी केली जात आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेवून  मरीन ड्राईव्ह  नेले आहे. दरम्यान या तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न का केला याबाबत अद्याप नेमकी माहिती मिळालेली नाही.

Exit mobile version