कल्याण रेल्वे स्थानकात एका अज्ञात व्यक्तीने दुपारी सुमारे दीड वाजण्याच्या सुमारास रेल्वेच्या विद्युत खांबावर चढून गोंधळ घातल्याची घटना घडली. सुरुवातीला आरपीएफ जवानांनी त्याला समजावून खाली उतरण्याचे आवाहन केले. मात्र, त्याने ऐकले नाही आणि एका पुलावरून दुसऱ्या पुलावर चालत गेला.
परिस्थिती गंभीर होत असल्याने कल्याणच्या रेल्वे प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून दोन ते तीन फलाटांवरील विद्युत पुरवठा खंडित केला. दरम्यान, त्या व्यक्तीने पोलिसांकडे मोबाईल फोनची मागणी केली. पोलिसांनी त्याला फोन दिला, मात्र त्याने तो खिशात ठेवून घेतला आणि सुमारे अर्ध्या तासानंतर तो फोन खाली फेकून दिला.
अखेर विद्युत प्रवाहाचा धक्का लागल्याने तो खाली पडला. त्याला तातडीने उपचारासाठी कल्याण येथील रुक्मिणीबाई रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.
सदर व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही. त्याने असे कृत्य का केले याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
