Marathi e-Batmya

मुंबईत २० हजार रूग्णसंख्येचा टप्पा पार झाल्यास लॉकडाऊन ?

मराठी ई-बातम्या टीम
मुंबईत सातत्याने वाढणाऱ्या रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर मुंबईत २० हजार रूग्णसंख्येचा टप्पा पार झाल्यास लॉकडाऊन लावण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याची चर्चा मुख्यमंत्र्याबरोबरील बैठकीत झाल्याची माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.
सॅनिटायझर किंवा साबणाने हात धुणे या एवढया छोटया गोष्टी जरी पाळल्या तर आपण लॉकडाऊनपासून खूप लांब राहू असेही त्या म्हणाल्या.
गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह कोरोनाचे रुग्ण मोठया प्रमाणात सापडत आहेत. त्यामुळे मुंबई महापालिकेचीही चिंता वाढली आहे. मुंबईचे पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनीसुद्धा लॉकडाऊनचे संकेत दिले आहेत. त्यामुळे लॉकडाऊन लागणार का याचीच चिंता सगळ्यांना सतावते आहे. सनदी अधिकारी आणि मुंबईचे पालिका आयुक्त विश्वासात घेत नाहीत अशी तक्रारही करत आयुक्तांच्या विरोधात राग व्यकत केला.
उद्धव ठाकरे कायम सांगत आहेत की, आपल्याला लॉकडाऊन परवडण्यासारखे नाही. आपल्याला लॉकडाऊन करायचाच नाही. परंतु लोक स्वैर वागत आहेत. मुंबईकरांनी अनेक आव्हाने पेलली आहेत. अनेक आव्हाने त्यांनी परतावली आहेत. ज्या पद्धतीने रुग्णसंख्या वाढतेय. त्याला आळा घालायचा असेल तर आपल्याला मार्गदर्शक तत्त्वे पाळायलाच हवीत. एसओपी काय आहे, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. दोन लसीचे डोस घेणे आवश्यक आहे. गर्दीत न जाणे हे श्रेयस्कर आहे. मास्क लावणे हे तर बंधनकारक आहे, असेही त्या म्हणाल्या.
खाण्याच्या वेळेला सॅनिटायझर किंवा साबणाने हात धुणे एवढया छोटया गोष्टी जरी आपण पाळल्या तर आपण लॉकडाऊनपासून खूप लांब राहू. बरेचशे रुग्ण एक लस आणि दोन लस घेऊनही बाधित झालेले आहेत. मुख्यमंत्री म्हणजे लाखोंचा पोशिंदा असतो. पोशिंदा म्हणजेच मुख्यमंत्री तर सुरक्षित राहिलेच पाहिजेत, पण माझी जनताही सुरक्षित राहिली पाहिजे हा त्यांचा सकारात्मक विचार असल्याचे स्पष्ट करत ओमायक्रॉन घातक नाही, पण नियम पाळण्याची गरज असल्याचे त्या म्हणाल्या.

Exit mobile version