मुंबई मेट्रो मार्ग- ५ठाणे- भिवंडी- कल्याण या प्रकल्पामध्ये स्थापत्य कामाच्या खर्चात सद्या तरी कोणतीही वाढ झाली नसली तरी ३ वर्षांची प्रकल्प दिरंगाई हा त्रासदायक आहे.आरटीआयच्या माध्यमातून उघडकीस आली आहे. या माहितीने एमएमआरडीएच्या मेट्रो प्रशासनातील हलगर्जीपणा आणि प्रकल्प व्यवस्थापनातील कमतरतेची बाब पुढे आली आहे.
आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मेट्रो प्रकल्प अंमलबजावणी शाखेकडे विविध माहिती विचारली होती. मेट्रो प्रकल्प अंमलबजावणी शाखेने अनिल गलगली यांस सविस्तर माहिती दिली. मुंबई मेट्रो मार्ग- ५ ठाणे- भिवंडी- कल्याणचे काम अफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीला १ सप्टेंबर २०१९ रोजी देण्यात आले होते. मुंबई मेट्रो मार्ग- ५ ठाणे- भिवंडी- कल्याण ठाणे हा १५ स्थानके असलेला २४.९० किमी लांबीचा एलिव्हेटेड कॉरिडॉर आहे. सदर काम १ मार्च २०२२ रोजी पूर्ण करणे अपेक्षित होते. आता नवीन डेडलाईन ही ३१ मार्च २०२५ अशी आहे.
अनिल गलगली यांनी वेळेत काम पूर्ण न करण्यासाठी दंडात्मक कारवाईची मागणी केली आहे. मुंबई मेट्रो मार्ग- ५ ठाणे- भिवंडी- कल्याण या प्रकल्पाचा स्थापत्य कामाचा अपेक्षित खर्च हा ८९८.१९ कोटी इतका आहे. सद्या तरी वाढीव खर्च झालेला नाही. ३ वर्षांची दिरंगाई लक्षात घेता दंडात्मक कारवाई करताना केवळ २०.८८ लाख इतका दंड आकारण्यात आला आहे.
मेट्रो ५ महत्वाचा मार्ग असून सध्या सुरू असलेल्या मेट्रो मार्ग -४ (वडाळा ते कासारवडवली) आणि प्रस्तावित मेट्रो मार्ग- १२ (कल्याण ते तळोजा) आणि मध्य रेल्वे यांच्यात परस्पर एकीकरण साधण्यात येईल. व्यावसायिक व शासकीय कर्मचारी तसेच ठाणे, भिवंडी व कल्याण परिसरात राहणाऱ्या नागरिकांसाठी हा मेट्रो मार्ग उत्तम सुविधा प्रदान करेल. हा मेट्रो मार्ग सध्याच्या प्रवासाची वेळ ५० % ते ७५ % पर्यंत कमी करेल, असे अनिल गलगली यांनी सांगितले.
