मुंबई: प्रतिनिधी
देशातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठांच्या यादीत मुंबई विद्यापीठाने स्थान पटकावले असून पहिल्या शंभर विद्यापीठांच्या क्रमवारीत मुंबई विद्यापीठ ६५ व्या स्थानावर पोहचले. तर महाराष्ट्रातील पारंपारिक राज्य विद्यापीठांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. राष्ट्रीय संस्थात्मक नामांकन (एनआयआरएफ) रँकिंगमध्ये मुंबई विद्यापीठाची कामगिरी सुधारली असून मागील वर्षी मुंबई विद्यापीठ ८१ व्या स्थानावर होते. विद्यापीठांच्या क्रमवारीसोबतच सर्वसाधारण क्रमवारीतही विद्यापीठाने मोठी मजल मारली असून ४२.४५ गुणांसह ९५ व्या स्थानावर पोहचले आहे.
गतवेळी सर्वसाधारण क्रमवारीत १०१-१५० या रँकिंग बँड मध्ये मुंबई विद्यापीठाचे स्थान होते. आज देशातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठांची २०२० वर्षाची यादी राष्ट्रीय संस्थात्मक नामांकन (एनआयआरएफ) तर्फे जाहीर करण्यात आली.
एकूण पाच वर्गवारीमध्ये विभागल्या गेलेल्या निकषांनुसार मुंबई विद्यापीठाला प्रत्येकी १०० गुणांपैकी टिचींग लर्निंग अँड रिसॉर्सेस ( टीएलआर ) ४८.०८, रिसर्च अँड प्रोफेशनल प्रॅक्टिस (आरपीसी) २०.८४, ग्रॅज्युएशन आऊटकम (जीओ ) ७७.९७, आऊटरिच अँड इन्क्ल्युजीवीटी (ओआय) ५३.६१ आणि पर्सेप्शन २३.७९ असे गुण बहाल करण्यात आले असून एकूण ४४ गुणांसह ६५ व्या स्थानावर मुंबई विद्यापीठ पोहचले आहे.
यासंदर्भात बोलताना मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सुहास पेडणेकर म्हणाले की, कोट- “एनआयआरएफच्या निकषांनुसार मुंबई विद्यापीठाने खूप मोठी सुधारणा केली आहे. ज्यामध्ये संशोधन प्रकाशन, पेटंट, संशोधन निधी आणि उत्तीर्ण टक्केवारी यांचा समावेश आहे. विद्यापीठातील सर्व शिक्षक आणि भागधारकांच्या मदतीने पुढील काळात रँकिंगमध्ये सुधारणा करण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले जातील.”
मुंबई विद्यापीठ पहिल्या ५० मध्ये नाही मात्र १०० नंबरात
