Marathi e-Batmya

देशभक्त असल्याची… प्रतिक्रिया समीर वानखेडेंची तर पत्नी क्रांती रेडकर म्हणाल्या सहकार्य….

केंद्र सरकारच्या एनसीबी विभागाचे झोनल ऑफिसर म्हणून समीर वानखेडे यांनी काम पहात असताना बॉलीवूड बादशाह शाहरूख यांना याचा चिरंजीव आर्यन खान याला खोट्या केस मध्ये अडकवून २५ कोटी रूपये उकळण्याचा डाव आखल्याप्रकरणी सीबीआयने नुकतेच समीर वानखेडे यांच्यावर गुन्हा दाखल करत वानखेडेंशी संबधित जवळपास ३९ ठिकाणी छापेमारी केली. त्यानंतर सीबीआय समीर वानखेडे यांच्या क्रांती रेडकर यांच्या निवासस्थानी छापा टाकत काही मालमत्तांची कागदपत्रे आणि १८ हजार रूपयांची रोकड जप्त कऱण्यात आल्याची माहिती पुढे आली.

आर्यन खान प्रकरणातील पंच प्रभाकर साईल याने याप्रकरणी पैशांच्या व्यवहाराचे आरोप केल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी सीबीआयने भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला आहे. तसंच, साक्षीदार के.पी गोसावी याचा आर्यन खानच्या कुटुंबियांकडून २५ कोटी उकळण्याचा डाव होता, असा खुलासाही सीबीआयने समीर वानखेडे आणि इतरांविरोधात असलेल्या एफआयआरमध्ये नोंदवला आहे. या प्रकरणी समीर वानखेडे यांच्या पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकर यांनी एएनआय या खाजगी वृत्तसंस्थेला महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया दिली.

समीर वानखेडे यांच्यावर होत असलेले आरोप चुकीचे आहेत, हे सर्वांना माहिती आहे. हे केवळ आरोप असून आम्ही सीबीआयला सहकार्य करत आहोत. कायदा आणि सुव्यवस्थेवर आमचा विश्वास आहे आणि आम्ही एक जबाबदार नागरिक म्हणून तपास यंत्रणेला सहकार्य करण्यास तयार आहोत, असं क्रांती रेडकर म्हणाल्या.

सीबीआयने काल माझ्या निवासस्थानावर छापा टाकला आणि १२ तासांपेक्षा जास्त वेळ झडती घेतली. माझ्या घरातून त्यांना १८ हजार रुपये रोकड आणि मालमत्तेची ४ कागदपत्रं सापडली आहे. संबंधित मालमत्ता मी सेवेत रुजू होण्यापूर्वी विकत घेतली होती. मला देशभक्त असण्याची शिक्षा मिळत आहे, अशी प्रतिक्रिया अधिकारी समीर वानखेडे यांनी दिली.

२ ऑक्टोबर २०२१ रोजी एनसीबीने एका क्रूझवर धाड टाकली होती. ड्रग्ज प्रकरणात केलेल्या या कारवाईत आर्यन खानसह २० जणांना अटक करण्यात आली होती. तेव्हा एनसीबी मुंबई विभागाचे माजी संचालक समीर वानखेडे होते. एनसीबीने आर्यन खानला जवळपास एक महिना कोठडीत ठेवलं होतं. पण, पुराव्याअभावी आर्यन खानची निर्दोष मुक्तता झाली.

Exit mobile version