Marathi e-Batmya

१०-१२ वीच्या परिक्षेच्या तारखा जाहिरः बालविवाह होवू नये यासाठी प्रयत्नशील

मुंबईः प्रतिनिधी
राज्यातील १० वी ची परीक्षा २९ एप्रिल ते ३१ मे २०२१ या कालावधीत घेण्यात येणार असून निकाल ऑगस्ट २०२१ मध्ये निकाल जाहिर करण्यात येणार आहे. तर १२ वीची परीक्षा २३ एप्रिल २०२१ ते ३१ मे २०२१ या कालावधी घेण्यात येणार असून जुलै २०२१ मध्ये १२ वीचा निकाल जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.
तसेच या दोन्ही इयत्तांच्या प्रात्यक्षिक परिक्षा १२ वी १ ते २७ एप्रिल, १० वीची ९ ते २८ एप्रिल या कालवाधीत घेण्यात येणार आहे. याशिवाय कोरोनामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम ऑनलाईन पध्दतीने सुरु असल्याने या कालावधीत पालकांकडून शिक्षण थांबवून मुलींचे बाल विवाह होण्याची शक्यता आहे. हे बालविवाह थांबविण्यासाठी शालेय शिक्षण विभागाकडून लवकरच विशेष मोहिम राबविली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शाळांनी पालकांकडून जास्तीची फी वसूल करू नये यासाठी न्यायालयात योग्य बाजू मांडणार
मुंबईसह राज्यातील अनेक शाळांकडून फि वसुलीचा तगादा लावला असल्याची अनेक प्रकरणे पुढे येत आहेत. मात्र या अनुषंगाने राज्य सरकारने जारी केलेल्या आदेशाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. पालकांकडून जास्तीची फि वसुल होवु नये यासाठी सरकारकडून न्यायालयात बाजू मांडण्यासाठी तयारी करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
नुकतेच अशाच एका प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने निकाल देत शाळांनी कोरोना काळ असल्याने आवश्यक अशा गोष्टींसाठीच फि आकारावी असे आदेश दिले असून शाळेच्या पायाभूत सुविधासह इतर गोष्टींसाठीची फि आकारू नये असे आदेश बजाविल्याचे स्पष्ट केले. त्या अनुषंगाने मुंबई उच्च न्यायालयात बाजू मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Exit mobile version