Marathi e-Batmya

बारावी पर्यंतच्या विद्यार्थिनींचा एसटीचा प्रवास होणार मोफत

मुंबईः प्रतिनिधी
राज्यातील ग्रामीण भागात राहणाऱ्या आणि शिक्षणासाठी बाहेरगावी जाणाऱ्या १२ वी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थींनीना एस.टी. प्रवास मोफत देण्याचा निर्णय राज्याच्या आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. तसेच एस.टी. महामंडळाच्या सवलतींची व्याप्ती वाढवण्याच्या निर्णयांर्तंगत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिली.
यापूर्वी दहावी पर्यंतच्या विद्यार्थिनींना ही सवलत देण्यात येत होती. एसटी महामंडळाकडून समाजातील विविध घटकांना प्रवासात सवलत देण्यात येते. यात प्रामुख्याने विद्यार्थी, जेष्ठ नागरिक, दिव्यांग आणि अनेक रुग्णांना विविध योजनांच्या माध्यमाने सेवा पुरवली जात असल्याची माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी मंत्रालयात सांगितले.
विविध योजनांची पूर्ती करताना महामंडळावर १ हजार ८०० कोटींचा बोजा पडणार असल्याचे ही रावते यांनी यावेळी सांगितले.
महामंडळाच्या सवलतींची व्याप्ती वाढवताना, ६५ वर्षा वरील जेष्ठ नागरिकांना आता शिवशाही बसच्या प्रवासातही सवलत देण्यात येणार आहे. त्याचबरोबर कर्करोग आणि क्षयरोग रुग्णांसाठी देण्यात येणारी ५० टक्के सवलत आता ७५ टक्क्यांवर नेण्यात आली आहे. राज्यातील ८४ हजार लाभार्थ्यांना मिळणार असल्याचे सांगत सिकलसेल, हिमोफिलिया आणि एच आय व्ही रुग्णांना एस.टी. प्रवासात १०० टक्के सवलत देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
दिव्यांग प्रवाश्याला ५० टक्के सवलत मिळत होती. त्यांना आता रेल्वेच्या धर्तीवर ६५ टक्के तर त्यांच्या सोबत असलेल्या व्यक्तीला ५० टक्के सवलत मिळणार आहे. लाभार्थ्यांना या प्रवास योजना लागू करताना आधारकार्ड संलग्न स्मार्टकर्ड देण्यात येणार आहे. तसेच यापूर्वी देण्यात येणाऱ्या सवलती ही अबाधित असल्याचे त्यांनी सांगितले.

Exit mobile version