पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त महायुती सरकारने मंगळवार, ६ मे रोजी अहिल्यानगर येथील चौंडी येथे मंत्रिमंडळ बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीसाठी अहिल्यानगरमधील सर्व सरकारी विश्रामगृहे आणि खाजगी हॉटेल्स दोन दिवस आधीच बुक करण्यात आली आहेत. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासह ३६ कॅबिनेट मंत्री, ६ राज्यमंत्री आणि वरिष्ठ अधिकारी आणि व्हीआयपी उपस्थित राहणार आहेत. या मंत्रिपरिषदेच्या एक दिवसाच्या बैठकीसाठी तब्बल दोन कोटी रूपयांचा खर्च करण्यात आल्याची माहिती पुढे येत अहे. अहिल्यानगर ते चौंडी हे अंतर अंदाजे ८५ किलोमीटर आहे.
राज्य सरकारकडून चौंडी येथे दीड एकर जागेवर एक विशेष वातानुकूलित मंडप बांधण्यात आला आहे. तसेच, तेथे पाच हेलिपॅड बांधण्यात आले आहेत. व्हीआयपींच्या आगमनाच्या वेळी वाहतूक कोंडी होणार नाही याची विशेष काळजी घेण्यात आली आहे. अहिल्यानगरमध्ये मंत्र्यांचे सचिव आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी शहरातील सर्व मोठी हॉटेल्स आणि सरकारी विश्रामगृहे आगाऊ बुक करण्यात आली आहेत. अहिल्यानगरमध्ये पहिल्यांदाच मंत्रिमंडळाची आणि मंत्रिपरिषदेची बैठक होत आहे. तसेच राज्य सरकारकडून मंत्रिमंडळ बैठकीसाठी जिल्हा प्रशासनाला अंदाजे २ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
२०२४ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलून अहिल्यानगर करण्याचा निर्णय घेतला होता. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या मराठा-मालवा साम्राज्याच्या प्रसिद्ध राणी होत्या. त्यांनी उत्तर भारतातील अनेक धार्मिक स्थळांचे नूतनीकरणही केले. अहिल्याबाई होळकर यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी येथील धनगर कुटुंबात झाला. तिचा विवाह होळकर घराण्याचे खंडेराव होळकर यांच्याशी झाला होता. पती खंडेराव होळकर आणि सासरे मल्हारराव होळकर यांच्या निधनानंतर, अहिल्याबाई होळकर यांनी स्वतः होळकर घराण्याचा कारभार हाती घेतला. त्यांनी घुसखोरांपासून मालवा राज्याचे रक्षण केले आणि स्वतः युद्धात सैन्याचे नेतृत्व केल्याचा इतिहास आहे.
यानिमित्ताने अहिल्यानगर येथे पहिल्यांदाच मंत्री परिषदेची बैठक पार पार पडत आहे. यापूर्वी अशी राज्य मंत्रिमंडळाच्या मंत्री परिषदेची बैठक मुंबई बाहेर औरंगाबाद वगळता कोठेही झाल्याची माहिती नाही.
