Marathi e-Batmya

मेहबुबा मुफ्ती म्हणाल्या, राष्ट्रध्वजाची जागा भगवा झेंडा घेईल

काही वर्षापूर्वी भाजपाने पीडीपीच्या प्रमुख मेहबुबा मुफ्ती यांच्याशी युती करत जम्मू काश्मीर मध्ये सरकार स्थापन केले. मात्र कालांतराने भाजपा आणि पीडीपीमध्ये राजकिय मतभेद झाल्यानंतर ही युती संपुष्टात आली. त्यातच जम्मू काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा काढून घेतल्यानंतर पीडीपीकडून सातत्याने टीका करण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर मेहबुबा मुफ्ती यांनी भीती व्यक्त करत म्हणाल्या, कोणताही देश
कितीही शक्तीशाली झाला तरी तो आपल्याच लोकांविरोधात युद्ध जिंकू शकत नाही. भाजपाने आमचा झेंडा काढला आणि येणाऱ्या काळात ज्या राष्ट्रध्वजासाठी अनेकांनी बलिदान दिलं, त्या राष्ट्रध्वजाची जागा भगवा झेंडा घेईल, असे वक्तव्य करत भाजपावर थेट निशाणा साधला.

या अगोदरही मेहबुबा मुफ्ती यांनी वेळोवेळी भाजपावर टीका केली आहे. जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील अप्पर डांगरी येथे नवीन वर्षांच्या पहिल्याच दिवशी घडलेल्या दहशतवादी हल्ल्यावरून त्यांनी, काश्मीरसह भारत एक धर्मनिरपेक्ष ठिकाण आहे, मात्र ही गोष्ट वेगळी आहे की आता याला गोडसेचा देश बनवलं जात आहे. केंद्र शासित प्रदेशातील प्रत्येक नागरिकाची हत्या जम्मू-काश्मीरमध्ये राहणाऱ्या लोकांचे मोठे नुकसान आहे. अशाप्रकारच्या हल्ल्यांमुळे एक विशिष्ट राजकीय पक्षाला फायदा होत असल्याची टीका केली होती.

राहुल गांधींच्या नेतृत्वात काँग्रेसची ‘भारत जोडो यात्रा’ काही दिवसांमध्ये जम्मू-काश्मीरला पोहचणार आहे. या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेसची तयारी सुरू झालेली आहे. काँग्रेसच्या काही वरिष्ठ नेत्यांनी उपराज्यपाल मनोज सिन्हा यांची भेट घेऊन, सुरक्षा व्यवस्थेवर चर्चा केली.
राज्यपालांकडून यात्रेला सुरक्षा प्रदान करण्याबाबतचे आश्वासन देण्यात आले आहे. याशिवाय काश्मीरमध्ये या यात्रेत केंद्र सरकारच्या अन्य विरोधी पक्षांचे नेतेही सहभागी होणार आहेत. सर्वच विरोधी पक्षाच्या नेत्यांना त्याबाबत निमंत्रण देण्यात आले असुन, नॅशनल कॉन्फरन्सचे फारुख अब्दुल्ला, उमर अब्दुल्ला, पीडीपी प्रमुख मेहबूबा मुफ्ती, सीपीएम नेते एमवाय तारिगामीही यात्रेत सहभागी होणार आहेत.

Exit mobile version