Marathi e-Batmya

कनाल- कदमावरील छापेमारीवर आदित्य ठाकरे आणि नितेश राणेंची टोलेबाजी

सकाळी दिवस उजाडताच आयकर विभागाने राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे राहुल कनाल आणि संजय कदम यांच्या घरावर धाड सत्र सुरु झाले. या धाडसत्रानंतर शिवसेना नेते आदित्य ठाकरे आणि भाजपा आमदार नितेश राणे यांच्यात अप्रत्यक्षरित्या एकमेकांवर निशाणा साधण्यास सुरुवात झाली.
भाजपाकडून या कारवाईचं समर्थन केले जात असून महाविकास आघाडीकडून कारवाईचा निषेध केला जात आहे. या पार्श्वभूमवीर प्राप्तीकर विभागाने छापा टाकलेले राहुल कनाल हे राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जातात. या पार्श्वभूमीवर आता आदित्य ठाकरेंनी संतप्त प्रतिक्रिया दिली असून हे दिल्लीचे महाराष्ट्रावर आक्रमण असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.
तर दुसऱ्याबाजूला राहुल कनाल आणि संजय कदम यांच्यावर प्राप्तीकर विभागाने छापे टाकल्यानंतर भाजपा आमदार नितेश राणे यांनी ट्वीट करून खोचक शब्दांत निशाणा साधला असून “राहुल कनाल…संजय कदम.. दोघांना आता प्राप्तीकर विभागाच्या कारवाईचा सामना करावा लागत आहे. नाईटलाईफ गँगच्या सदस्यांना आता रात्रीची झोप लागणार नाही. ये रात की सुबह नही!” असे नितेश राणेंनी आपल्या ट्वीटद्वारे उपरोधिक टोला लगावला.

दरम्यान, आदित्य ठाकरेंनी यावर प्रतिक्रिया देताना भाजपाला महाविकास आघाडीची भीती वाटू लागल्याचे दिसून येत असून महाराष्ट्रावर आधीही अशी आक्रमणे झाली आहेत. हे दिल्लीचे आक्रमणच आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये जेव्हा इथे निवडणुका लागतील असे समजले आणि महाविकास आघाडीची भाजपाला भीती वाटायला लागली, तेव्हापासून हे सुरू असल्याचा खोचक टोला लगावला.

उत्तर प्रदेशात असे केलेलं, हैदराबादमध्ये असेच केलेलं, पश्चिम बंगालमध्ये देखील असंच केलेलं. आता महाराष्ट्रात निवडणुका येत आहेत, म्हणून इथेही तसंच करत आहेत. सगळ्या केंद्रीय तपास यंत्रणा भाजपाच्या प्रचार यंत्रणाच झालेल्या आहेत. पण महाराष्ट्र झुकणार नाही आणि महाराष्ट्र थांबणार नाही. ही तर भाजपाची प्रचार यंत्रणाच आहे. लोकशाही राहिली कुठेय? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

Exit mobile version