Marathi e-Batmya

अखेर मनसेप्रमुख राज ठाकरेंच्या सुरक्षेत राज्य सरकारने केली वाढ

काही दिवसांपूर्वी मनसे प्रमुख राज ठाकरे यांना धमकी देणारे पत्र मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्या कार्यालयात आले. त्यानंतर नांदगावकर यांनी यासंदर्भात राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची भेट घेत राज ठाकरेंच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी केली. त्यातच काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातील भाजपा खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनीही राज ठाकरे यांना अयोध्येत पाऊल ठेवू देणार नसल्याचा इशारा दिला आहे. यापार्श्वभूमीवर राज ठाकरेंच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी सातत्याने मनसेकडून करण्यात येत होती. त्यामुळे अखेर राज्य सरकारने राज ठाकरेंच्या सुरक्षेत वाढ करत वाय दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय घेत तसे आदेश गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी पोलिस यंत्रणेला दिले.
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना आधीच वाय प्लस दर्जाची सुरक्षा आहे. राज्य सरकारने वाय प्लस दर्जाची सुरक्षा कायम ठेवली असून फक्त पोलिसांच्या संख्येत वाढ केली आहे. एक अतिरिक्त पोलीस अधिकारी आणि अंमलदार राज ठाकरेंच्या सुरक्षेसाठी तैनात असतील.
बाळा नांदगावकर यांनी राज ठाकरेंना जीवे मारण्याची धमकी मिळाली असल्याची माहिती बुधवारी दिली होती. यावेळी त्यांनी राज ठाकरेंच्या केसाला जरी धक्का लागला तर महाराष्ट्र पेटेल असा इशारा दिला होता. धमकीच्या पत्रामध्ये उर्दू शब्दांचा वापर करण्यात आले असल्याचे बाळा नांदगावकर यांनी सांगितले होते.
मला एक धमकीचं पत्र आलं आहे. भोंग्याचा विषय समोर आल्यापासून अशा प्रकारच्या धमक्या मिळत आहेत. पत्रात माझ्यासोबत राज ठाकरेंना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. मी राज ठाकरेंना पत्र दाखवलं आणि पोलीस आयुक्तांना भेटल्याचे बाळा नांदगावकर यांनी सांगितले होते.
अजानबाबात जे करत आहात ते बंद करा, अन्यथा तुम्हाला ठार करु. तुम्हाला तर सोडणार नाहीच पण राज ठाकरेंनाही मारुन टाकू असं पत्रात लिहिलं असल्याची माहिती नांदगावकरांनी यावेळी दिली होती. हे हिंदी पत्र असून त्यात उर्दू शब्दही असल्याचे त्यांनी सांगितलं होते.

Exit mobile version