Marathi e-Batmya

गृहमंत्री पदावरून दिलीप वळसे-पाटील म्हणाले की, हे सारे मुख्यमंत्र्यांनाच…

अॅड. सतीश उके यांच्यावर केंद्रीय यंत्रणांनी केलेल्या कारवाईवरून शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी गृह मंत्र्यांच्या विरोधात नाराजी व्यक्त केल्यानंतर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील हे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या भेटीला रवाना झाले. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, मुख्यमंत्र्यांना भेटल्यानंतर याबाबतची माहिती तुम्हीच त्यांना विचारा असे सांगत याप्रश्नी अधिक बोलण्याचे टाळले.
तर कामकाजाच्या अनुषंगाने आमची भेट होत रहाते. त्याच अनुषंगाने ही भेट झाल्याचे स्पष्ट करत या प्रकरणावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री कार्यालयामार्फत आधीच खुलासा केला आहे. अशाप्रकारची कुठलीही नाराजी नाही. नाराजी असण्याचा प्रश्न नाही. आम्ही परस्परांना विश्वासात घेऊनच सगळे निर्णय घेत असतो असेही त्यांनी सांगितले.
यावेळी त्यांना शिवसेना गृहमंत्रीपदासाठी आग्रही आहे का? असे विचारण्यात आले असता ते म्हणाले की, मला तरी तसे वाटत नाही. पण उद्या मुख्यमंत्री जर तुम्हाला भेटले तर त्यांनाच विचारा.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शुक्रवारी केंद्रीय तपास संस्थांच्या महाराष्ट्रातील कारवाईच्या मुद्द्यावर गृहखात्यावर नाराजी व्यक्त केली. तसेच या कारवायांच्या विरोधात कोणी ‘आहिस्ते कदम’ भूमिका घेत असेल तर ते स्वतःसाठी फाशीचा दोर वळत असल्याचा इशारा दिला. यावर आता राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यात दिलीप वळसे पाटलांनी संजय राऊत यांची भावना बरोबर असल्याचे म्हटले.
दिलीप वळसे पाटील म्हणाले, संजय राऊत यांची भावना बरोबर आहे. त्याबाबत आमच्या विभागाकडून काही कमतरता होत असतील जरूर त्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न करू.
त्यानंतर संध्याकाळी पुन्हा एकदा गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील हे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या भेटीसाठी वर्षा निवासस्थानी गेले होते. यावेळी या दोघांमध्ये सव्वातास चर्चा झाली. त्यानंतर ते बाहेर पडले.
दरम्यान रात्री उशीराने शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी आपल्या वक्तव्यावरून घुमजाव करत गृहमंत्री चांगले असून अदलाबदलीच्या ज्या काही बातम्या चालविल्या जात आहेत त्या चुकीच्या असल्याचे सांगितले.

Exit mobile version