Marathi e-Batmya

“तो” व्हिडिओ शेअर करत आयुक्तांनी काढली राणा, फडणवीसांच्या आरोपातील हवा

राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या घरासमोर हनुमान चालिसाप्रकरणी सध्या अटकेत असलेल्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी नुकतेच लोकसभा अध्यक्षांना पत्र पाठवित आपल्याला नैसर्गिक विधीसाठी शौचालय वापरू दिले नाही की, पाणी पिण्यासाही आपल्याला पाणी दिले नसल्याचा गंभीर आरोप केला. परंतु राणा दांम्पत्याला दिलेल्या वागणूकीचे सीसीटीव्ही फुटेजच मुंबई पोलिस आयुक्त संजय पांडे यांनी ट्विटरद्वारे उघडकीस आणत त्यांच्या आरोपातील हवाच काढून घेतली.
हनुमान जयंतीच्या दिवशी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या घरासमोर हनुमान चालिसा म्हणणार असल्याचे आव्हान दिले. तसेच शिवसैनिकांनी हवे तर मला रोखून दाखवावे असा आव्हान दिले. त्यानंतर राणा दांम्पत्य हे खार येथील त्यांच्या निवासस्थानी येत शिवसेना आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना आव्हान देवू लागल्या. हनुमान जयंतीच्या दिवशी राणा दांम्पत्याने आपल्या घरातूनच हनुमान चालिसा म्हणत आंदोलन करत असल्याचे जाहीर केले. त्यानंतर मुंबई पोलिसांनी घराबाहेर न पडण्याबाबत नोटीस बजाविली. त्याचबरोबर प्रसारमाध्यमांशी बोलताना वक्तव्य करू नये अशी सूचनाही केली.
तरीही राणा दांम्पत्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत शिवसैनिकांना भडकाविणारी प्रक्षोभक वक्तव्ये करत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या विरोधात वक्तव्य करत संपूर्ण शासकिय यंत्रणेला आव्हान दिले. त्यामुळे अखेर पोलिसांनी त्यांना अटक कऱण्यासाठी त्यांच्या घरी गेले असता पोलिसांशी उध्दटपणे वागत पोलिसांसोबत अरेरावीची भाषा केली. अखेर पोलिसांनी या दांम्पत्याला राजद्रोहाच्या आरोपाखाली अटक केलीच. त्यानंतर सुट्टीकालीन न्यायालयात या दोघांना रविवारी हजर केले असता या दोघांना न्यायालयीन कोठडी सुनावली. तसेच या दांम्पत्याने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतही पोलिसांच्या कृतीला आव्हान दिले. मात्र न्यायालयाने पोलिसांनी केलेली कारवाई असल्याचे आणि सकृतदर्शनी तसे पुरावे असल्याचे मत नोंदवित राणा दांम्पत्याला कान पिचक्या दिल्या.
त्यानंतर खासदार नवनीत राणा यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहीत पोलिसांनी आपल्याला नैसर्गिक विधी करण्यास शौचालय वापरू दिले नाही की पिण्यासाठी पाणी मागितले असता पाणीही दिले नसल्याचा गंभीर आरोप करत पोलिसांनी आपल्याला जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोपही केला. त्यामुळे अखेर याप्रकरणी पोलिसांकडून नेमके काय घडले यावरून चर्चेला उधाण आले.
यापार्श्वभूमीवर मुंबई पोलिस आयुक्त संजय पांडे यांनी अटकेनंतर ज्या पोलिस ठाण्यात राणा दांम्पत्याला आणण्यात आले तेथील सीसीटीव्ही फुटेजच ट्विट करत प्रसारीत केले.
या प्रसारीत कऱण्यात आलेल्या व्हिडिओ फुटेजमध्ये राणा दांम्पत्य पाणी नाही तर चक्क चहा पित असल्याचे दिसून येत असून हे दोघेही आरामात खुर्चीवर बसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नवनीत राणा यांच्या आरोपातील फोलपणा उघडकीस आला आहे. त्याचबरोबर विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही यासंदर्भात पोलिसांवर जे आरोप केले ते ही खोटे असल्याचे दिसून आले आहे.

Exit mobile version