Marathi e-Batmya

अरविंद बन्सोड हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे द्यावा

पुणे: प्रतिनिधी
अरविंद बनसोड याची हत्या झाली असून पोलिसांमार्फत ही आत्महत्या असल्याचे जाणीवपूर्वक पसरवले जात आहे. त्यामुळे हे प्रकरण केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग (सीबीआय) कडे देण्यात यावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली.
नागपूर, थंडीपवनी येथे अरविंद बनसोड याची हत्या करण्यात आली होती. २७ मे रोजी झालेल्या या हत्याप्रकरणी पोलिसांनी राजकीय दबावापोटी आत्महत्येचा गुन्हा दाखल करून घेतला. कारण आरोपी मिथिलेस उमरकर हा गृहमंत्र्यांचा नातेवाईक आहे, म्हणून हे प्रकरण दडपण्यात येत असल्याचा आरोप बनसोड यांच्या नातेवाईकांनी केला. घटना घडली त्यावेळेस मयत अरविंद बनसोड याचा मित्र गजानन राऊत हा घटनास्थळी उपस्थित होता. त्याच्या समोर आरोपींनी बनसोड याला जबर मारहाण केली आणि नंतर त्यांनीच बनसोडला कीटकनाशक पाजले, प्रकरण हाताबाहेर गेल्याचे समजताच आरोपींनी कोणालाही न विचारता, बनसोडला स्वतःच्या गाडीत टाकून हॉस्पिटलमध्ये नेले, त्यापूर्वीच बनसोडचा मृत्यू झाला होता, अशी माहिती राऊत याने पोलिसांना दिली. मात्र पोलीस याबाबत कायदेशीर कारवाई करायला तयार नाही. त्यामुळे हे प्रकरण सीबीआयकडे देण्यात यावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली.

Exit mobile version