Marathi e-Batmya

जितेंद्र आव्हाड यांचा सवाल,… की गरीब माणसं फक्त मरण्यासाठी जन्माला येतात?

कोपर-कळवा रुग्णालयात कालपासून तब्बल १७ रुग्णांचा मृत्यू ओढवल्यामुळे खळबळ उडाली आहे. रुग्णांच्या नातेवाईकांबरोबरच मनसे नेते अभिजित जाधव व ठाकरे गटाचे नेते केदार दिघे यांनी कार्यकर्त्यांसह रुग्णालयात प्रशासनाला जाब विचारला. यावेळी रुग्णालयात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड हेही रुग्णालयात दाखल झाले. यावेळी माध्यमांशी बोलताना जितेंद्र आव्हाडांनी ठाणे पालिका प्रशासन व रुग्णालय प्रशासनावर संतप्त शब्दांत टीका केली.

जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करताना म्हणाले, आज सकाळी उठताच पत्रकारांचे फोन आले की, कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात १७ रुग्ण दगावले. अतिशय वाईट बातमी आहे. पण याची गांभीर्याने दखल ठाणे महानगर पालिका प्रशासन घेईल असे मला काही वाटत नाही. परवा २ दिवसांपूर्वीचे प्रकरण जर गांभीर्याने घेतलं असत तर आज हे घडलं नसतं अशी खंतही व्यक्त केली.

पुढे जितेंद्र आव्हाड ट्विटमध्ये लिहितात, आज टीव्हीसमोर पुढे येऊन काहीजण त्यांची बाजू घेताना दिसत आहेत हे दुर्देव आहेत. जे गेले त्यांच्या घरच्यांना काय वाटत असेल; याची जराही भिती, खंत हॉस्पिटलची बाजू घेणाऱ्यांच्या मनात दिसत नाही. प्रशासनाला याचा जाब विचारायलाच पाहिजे. तसेच या १७ जणांच्या मृत्यूची जबाबदारी कोणीतरी घ्यायला हवी, असे सांगत ह्या संपूर्ण प्रकरणाची तसेच हॉस्पिटलने संपूर्ण हॉस्पिटलचे ऑडिट करून जाहीर करावे अशी राष्ट्रवादी कांग्रेस मागणी करीत आहोत असेही ट्विटद्वारे म्हणाले.

कोपर- कळवा रुग्णालयात शनिवारी रात्रीपासून रविवारी सकाळपर्यंत म्हणजे अवघ्या १२ तासांत तब्बल १६ रुग्णांचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे. या घटनेमुळे रुग्णांच्या नातेवाईकांसह मनसे, ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे अशा अनेक नेत्यांनी ट्विटरवर संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. रुग्णाच्या नातेवाईकांनी हलगर्जीपणा, डॉक्टर-नर्सची कमतरता, अपुऱ्या सोयी-सुविधांना दोष दिला असताना रुग्णालय प्रशासनाने मात्र रुग्ण अत्यवस्थ अवस्थेतच दाखल झाले होते, अशी भूमिका घेतली आहे.

जितेंद्र आव्हाड म्हणाले, बेशरमपणाची हद्द आहे. पाच मृत्यू झाल्यानंतर कुणीही काळजी घेतली नाही. आम्ही गडबडून गेलो. शेवटी प्रशासनावर कुणाचा हक्क असतो? महापालिकेचा असतो. माळगावकर स्वभावाला चांगला माणूस आहे. पण डोकं नसलेला माणूस आहे. ज्यांचं इथे काम नाही, त्यांनाच इथे आणून ठेवलं आहे. या मृत्यूंना सर्वस्वी महापालिकाच जबाबदार आहे. १७ मृत्यूंची जबाबदारी कुणीतरी स्वीकारावी लागेल. हे ठाणेकरांना न शोभणारं आहे. इथे येणारा प्रत्येक माणूस गरीब घरातला असतो. वाडा, मोखाडा, पालघरमधून आदिवासी लोक येतात उपचारांसाठी. त्यांचं जेवणही हे प्रशासन खातं. खायला दोन अंडी दिली पाहिजेत. प्रोटीन्स दिले पाहिजेत. वाडग्यात भात आणि डाळ देतात खायला, असा आरोप केला.

पुढे जितेंद्र आव्हाड म्हणाले, हे बेशरम प्रशासन आहे. आजही रुग्णालयात नर्स, डॉक्टर्स कमी आहेत. याची जबाबदारी कुणी स्वीकारणार की नाही? की गरीब लोक फक्त मरण्यासाठी जन्माला येतात? मुख्यमंत्र्यांनी पाच मृत्यूंनंतर तातडीने बैठक घ्यायला हवी होती. हे त्यांचं शहर होतं. तुमच्याकडून काही अपेक्षा आहेत. तुम्ही कुठलीच अपेक्षापूर्ती केली नाही, तर कसं जमायचं? असा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केला.

Exit mobile version