Marathi e-Batmya

औरंगाबादमधील सभेप्रकरणी मनसे प्रमुख राज ठाकरेंवर “हे” गुन्हे दाखल

औरंगाबाद येथील सभे दरम्यान अचानक अजाण सुरु झाल्यानंतर राज ठाकरे यांनी उपस्थित पोलिस अधिकाऱ्यांना विनंती करत आताच्या आता पोलिसानी तेथे जावे आणि त्यांच्या तोंडात बोळा कोंबावा अशी विनंती केली. त्याचबरोबर यांना सरळ भाषेत सांगितलेले कळत नाही तर तर ह्याच्या आयला एकदा होवून जावूदेच अशी प्रक्षोभक भाषा वापरत सभेसाठी जमलेल्या समुदायाला तुम्ही शांत बसू नका असा असे आवाहन केले. मात्र मनसेला सभेसाठी घालून दिलेल्या अटी आणि शर्तीचे पालन न केल्याने मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे.

१ मे रोजी झालेल्या सभेच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादमधील सिटी चौक पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सभेसाठी अटी व शर्थींसह परवानगी देण्यात आली होती. मात्र सभेदरम्यान या अटींचे पालन झाले नाही आणि नियम देखील मोडले गेल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

या संदर्भात सिटी चौक पोलीस स्टेशनचे पोलीस उप निरीक्षक गजानान इंगळे यांनी फिर्याद नोंदवली आहे. त्यानुसार राज ठाकरे, राजीव जेवळीकर व इतर आयोजकांविरोधात -१२७/२०२२ कलम ११६,११७,१५३ भादंवि १९७३ सह कलम १३५ महाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ सुधारीत ३१ जुलै २०१७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आल आहे. याबाबत अधिक तपास सिटी चौक पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक गिरी हे तपास करत आहेत.

राज ठाकरे यांनी औरंगाबादच्या सभेत बोलताना मशिदींवरील भोंगे काढण्यासाठी ४ मे रोजचा अल्टिमेटम दिलेला आहे. भोंग काढले गेले नाहीत तर मशिदींसमोर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा पठण केले जाईल, असा इशाराही त्यांनी दिलेला आहे. त्यामुळे आता उद्या मनसे नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.

Exit mobile version