Marathi e-Batmya

अवनी वाघिणीच्या हत्येचे पडसाद मंत्रिमंडळ बैठकीत

मुंबई: प्रतिनिधी
नरभक्षक आवनी वाघिणीला गोळ्या घालून ठार केल्यावरून राज्याच्या राजकारणात सत्ताधारी विरूध्द विरोधक असा सामना रंगल्याचे दिसत आहे. त्यातच आता राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत वनमंत्री तथा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार विरूध्द शिवसेनेच्या मंत्र्यांमध्ये या अवनीप्रकरणावरून राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चांगलीच खडाजंगी झाली.
शिवसेनेचे मंत्री मंत्रिमंडळ बैठकीत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर निशाणा धरणार हे गृहीत धरून मुनगंटीवार या बैठकीला उशीरा पोहचले.मंत्रिमंडळ बैठकीची नियोजित वेळ सकाळी अकरा वाजता असताना मुनगंटीवार हे उशीरा पोहचले. तोपर्यत बैठकीत इतर विभागांच्या प्रस्तावावर चर्चा करून मंत्रिमंडळाने मान्यता दिली. मुनगंटीवार उपस्थित झाल्यानंतर शिवसेनेच्या मंत्र्यांनी अवनीच्या हत्येचा मुद्दा उपस्थित करीत वनमंत्र्यांना चांगलेच फैलावर घेतले. ही खडाजंगी सुरू असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक आवरती घेतली.
विशेषतः अवनीला ठार मारताना वनविभागाच्या कर्मचाऱ्यां व्यतीरिक्त बाहेरचा व्यक्ती सहभागी असल्याचे उघडकीस आल्याने या वाघिणीला मारण्याची खरच गरज होती का ? असा सवाल काँग्रेसकडून उपस्थित करण्यात आला. तसेच या हत्येच्या चौकशीची मागणीही करण्यात आली. त्यातच शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनीही याप्रकरणाची समितीमार्फत चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यामुळे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार हे एकटे पडल्याचे चित्र निर्माण झाले.
दरम्यान पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी अवनीच्या हत्येची न्यायालयीन चौकशीची मागणी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना केली. अवनीची हत्या केली असून ज्यांनी हत्या केली आहे. तेच चौकशी करीत आहेत. हा केवळ चौकशीचा फार्स आहे. त्यामुळे या हत्येची न्यायालयीन चौकशी झाली पाहीजे.
तर दुसऱ्याबाजूला मीच न्यायालयीन चौकशीची मागणी केल्याचे वनमंत्री मुनगंटीवार यांनी सांगत अवनीच्या मृत्यूची चौकशी कोणत्याही समितीमार्फत होऊ द्या. कदम यांनी मागणी केली असली याबद्दल मला माहित नाही. मात्र मी स्वत्तः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे न्यायालयीन चौकशीची मागणी केल्याचे त्यांनी सांगितले.

Exit mobile version