Marathi e-Batmya

आधी आम्ही भाजपची बी टीम आहोत का सांगा, मगच आघाडी

मुंबई: प्रतिनिधी
आगामी विधानसभा निवडणूकीच्या निमित्ताने समविचारी पक्षांची आघाडी करण्याबाबत काँग्रेस पक्षाकडून वंचित बहुजन आघाडीला पत्र पाठविले. मात्र लोकसभा निवडणूकीत भाजपची बी टीम म्हणून आमच्यावर आरोप करण्यात आला. त्याअनुषंगाने वंचित बहुजन आघाडी भाजपची बी टीम आहे का? याचे उत्तर काँग्रेसने द्यावे त्यानंतरच त्यांच्यासोबत आघाडी करण्याबाबतचा निर्णय घेणार असल्याचे वंचित आघाडीचे अध्यक्ष अँड. प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसला सुनावले.
कॉंग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे नवनियुक्त अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडून दिनांक 17 जुलै 2019 रोजी वंचित बहुजन आघाडीच्या पक्ष कार्यालयात पत्र प्राप्त झाले. ह्या पत्रातील मजकुरात वंचित बहुजन आघाडी सोबत युती करण्या संदर्भात प्रस्ताव मांडण्यात आला होता. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने दिनांक 19 जुलै 2019 रोजी रितसर उत्तरही देण्यात आले होते ते म्हणजे; लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान कॉंग्रेसच्या महाराष्ट्रातील आणि वरिष्ठ नेत्यांकडून वंचित बहुजन आघाडी ही भाजपाची बी टीम आहे, असा आरोप केला गेला होता.’ जर वंचित बहुजन आघाडी भाजपची बी टीम आहे , असा आपला (कॉंग्रेसचा)आरोप आहे ,तर प्रथमतः काँग्रेस पक्षाने वंचित बहुजन आघाडी बाबत त्यांच्या नजरेत काय समज (स्टेट्स ) आहे हे प्राधान्याने कळवावे अशी मागणी त्यांनी काँग्रेसकडे पत्राद्वारे केल्याचे त्यांनी सांगितले.
त्यास उत्तर म्हणून काँग्रेस पक्षाकडून पुन्हा 24 जुलै 2019 रोजी युती संदर्भातले पत्र वंचित बहुजन आघाडी पक्ष कार्यालयास प्राप्त झाले . त्यात वंचित बहुजन आघाडी कडून कॉंग्रेसला विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी उत्तरही दिलेले नाही . ह्या संदर्भात काँग्रेस पक्षाला पुन्हा आमच्याकडून 29 जुलै 2019 रोजी उत्तर दिले गेले कि , काँग्रेस पक्षाच्या पत्रातील मजकुरात आम्ही विचारलेल्या प्रश्नांना काहीच उत्तर दिले नाही.
तेव्हा आम्ही कळविले कि,’काँग्रेस पक्षाकडून उक्त विषयासंदर्भात कोणतेही ठोस उत्तर प्राप्त झाल्याशिवाय पुढील बोलणी होऊ शकत नाही’ अशा स्पष्ट शब्दात त्यांनी काँग्रेसला सुनावले.
तसेच काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते वंचित आघाडीत सामील होण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र त्यांना वंचित मध्ये प्रवेश देणार नसल्याची स्पष्टोक्ती त्यांनी दिली.

Exit mobile version