मुंबईः प्रतिनिधी
दिलेल्या मुदतीत राज्यातील सत्ता स्थापनेच्यासंदर्भात शिवसेनेकडून मागण्यात आलेल्या वाढीव मुदतीस नकार देत राज्यपाल कोश्यारी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता स्थापनेसाठी दावा करण्यासंदर्भात बोलाविले. त्यानुसार आज रात्रो ८.३० वाजेपर्यंतची मुदत राज्यपालांनी राष्ट्रवादींला दिली. मात्र ही मुदत पूर्ण होण्याआधीच राज्यपालांनी ३५६ कलमान्वये राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यासंदर्भात केंद्राला शिफारस केली.
राज्यात सत्ता स्थापन करण्याच्या अनुषंगाने शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात बैठकांचे सत्र सुरु होते. या बैठकांमध्ये वेळ जात असल्याने अंतिम तोडगा सोमवारी निघाला नव्हता. त्यानंतर आज दुसऱ्या दिवशी मंगळवारीही हाच बैठकांचा सिलसिला सुरु होता. मात्र दरम्यानच्या काळात राज्यपालांनी राष्ट्रवादीला सत्ता स्थापनेसाठी विचारणा केली.
त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसने सत्ता स्थापन करण्यासाठी काल रात्री पर्यंत अडकलेली चर्चा अशीच पुढे सुरु ठेवली. तसेच या चर्चेसाठी आणखी वेळ लागणार असल्याचे लक्षात येताच दुपारी १२ च्या दरम्यान राष्ट्रवादीकडून रात्रो ८.३० ऐवजी उशीरा १०.३० ते ११.३० पर्यंतची वाढीव वेळ मागणारे पत्र राज्यपालांना पाठविण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितले.
मात्र आधी दिलेल्या वेळेपर्यंत राज्यपाल कोश्यारी हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेची वाट पाहिल अशी अटकळ बांधण्यात येत होती. मात्र राज्यपालांनी रात्रो ८.३० वाजेपर्यंतची वाट पाहताच त्यांनी केंद्र सरकारला राष्ट्रपती राजवट लागू करण्यासंदर्भात शिफारस केली. त्यामुळे संध्याकाळपर्यंत यावर दिल्लीत खलबते होत अखेर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आल्याची घोषणा केंद्रीय गृह मंत्रालयाला केली.
राष्ट्रवादीची वेळ पूर्ण होण्याआधीच राज्यपालांकडून राष्ट्रपती राजवटीची शिफारस
