सोलापूर: प्रतिनिधी
आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जन आर्शीवाद यात्रेच्या निमित्ताने सोलापूरातील वालचंद महाविद्यालयात कार्यक्रमासाठी येत असलेले युवा सेना प्रमुख आदीत्य ठाकरे यांना अटकाव करण्यासाठी महाविद्यालयासमोर आलेल्या भीम आर्मीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते आंदोलनासाठी जमा झाले. मात्र पोलिसांनी भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांना अटक केली.
महाविद्यालयासारख्या शैक्षणिक क्षेत्रात सर्व जातीचे, धर्माचे व वेगवेगळ्या संघटनेचे व पक्षाच्या विचारांचे विद्यार्थी असतात. मात्र शैक्षणिक व्यतिरिक्त राजकीय नेते व त्यांच्या राजकीय भाषणांना शैक्षणिक संस्थेत थारा देवू नये अशी मागणी भीम आर्मी भारत एकता मिशनचे सोलापूर जिल्हा प्रमुख अॅड अखिल शाक्य यांनी केली होती. आदीत्य ठाकरे यांच्या उपस्थितीत सोलापूरच्या वालचंद महाविद्यालयात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे भीम आर्मीच्या संतप्त कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने येऊन ठाकरे यांच्या आगमनादरम्यान महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर आंदोलनाला सुरूवात केली असता सोलापूर पोलीसांनी अॅड अखिल शाक्य अक्की कांबळे,ऍड अखिल शाक्य- जिल्हाध्यक्ष दर्शना गायकवाड-जिल्हा महासचिव मनोज चलवादी-शहर अध्यक्ष,डी.डी. पांढरे-जिल्हा संघटक, अजय मेदर्गिकर -शहर सरचिटणीस, बाबा कांबळे, विश्वजीत तळभंडारे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते यांना अटक केली. भीम आर्मी पदाधिका-यांच्या अटकेची बातमी कळताच भीम आर्मीचे माजी प्रदेश प्रमुख व राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य अशोकभाऊ कांबळे यांनी या घटनेचा निषेध करतानाच पोलीस स्टेशनला जाऊन सर्व अटकेतील कार्यकर्त्यांची भेट घेतली.
दरम्यान कांबळे यांनी या अटकेचा निषेध करतानाच आदीत्य ठाकरे यांनी महाविद्यालयात राजकीय भाषण केल्यास त्यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्याची मागणी पोलीसांकडे केली.
राजकिय भाषण केल्यास आदीत्य ठाकरेंच्या विरोधात गुन्हा नोंदवा
