Marathi e-Batmya

समाजविघातक शक्तींचा कुटील राजकीय डाव हाणून पाडा

मुंबईः प्रतिनिधी

भिमा कोरेगांव, वढू बु. सणसवाडी आणि शिक्रापूर येथे मानवंदना देण्यासाठी जमलेल्या दलित बांधवांसोबत झालेली घटना दुर्देवी असून काँग्रेस पक्ष या घटनेचा तीव्र निषेध करीत आहे. अफवांवर विश्वास न ठेवता सर्वांनी शांतता आणि संयम राखून समाजात फूट पाडणा-या समाजविघातक शक्तींचा हा कुटील राजकीय डाव हाणून पाडावा असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केले.

दरवर्षी १ जानेवारीला भिमा कोरेगांव येथील विजयी स्तंभाला अभिवादन करण्यासाठी हजारो लोक येतात. त्यास यंदा २०० वर्ष पूर्ण झाल्या निमित्त लोक मोठ्या संख्येने येणार होते. पोलीस प्रशासनाला याची पूर्ण कल्पना होती. आरएसएसशी संबंधित लोकांनी चार पाच दिवसांपासून या परिसरात अफवा पसरवून परिस्थिती बिघडवण्याचे काम करत असल्याची पूर्ण कल्पना पोलिसांना होती. तरीही पोलिसांनी प्रतिबंधात्मक उपाय केले नाहीत वा पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवला नसल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

दलित आणि मराठा समाजात भांडणे लावून त्याचा राजकीय फायदा उचलण्याचा काही समाघविघातक प्रवृत्तीचा डाव असल्याचे कालच्या घटनेवरून स्पष्ट झाले असून फुलेशाहूआंबेडकरांच्या विचारधारेला मानणा-या सर्वांनी एकत्र येऊन लोकशाही मार्गाने लढा देऊन हा कुटील राजकीय डाव हाणून पाडण्याची आवश्यकता असल्याचे मतही त्यांनी यावेळी मांडले. 

पुण्यातून आलेल्या काही समाजकंटकांनी हैदोस घालून हिंसाचार केला आणि पोलिसांनी काहीही कारवाई न करता फक्त बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोप करत या संपूर्ण प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली.

Exit mobile version