Marathi e-Batmya

मुख्यमंत्री आणि गृहमंत्री पदाच्या आदला बदलीच्या वक्तव्यावरून महाविकास आघाडीत खळबळ

राज्यातील महाविकास आघाडीतील ऐक्यतेवरून प्रत्येक वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडून सातत्याने ग्वाही देण्यात येते. मात्र राज्यात मुख्यमंत्री, गृहमंत्री पदांची आदलाबदल करण्याबाबत शिवसेनेतील काही नेत्यांकडून मागणी करण्यात येत असल्याचे वक्तव्य भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केल्यानंतर मुख्यमंत्र्यांपासून ते गृहमंत्र्यांपर्यंत सर्वांनाच खुलासे देण्याची पाळी आली.
यासंदर्भात एका वृत्त वाहीनीशी बोलताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, शिवसेनेतील काही नेत्यांकडून गृहमंत्री पदाची मागणी करण्यात येत आहे. राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री असून त्यांना सर्व खात्यांच्या मंत्र्यांचे अधिकार असतात. तसेच ती सर्व खाती त्यांच्या नियंत्रणात असतात. तरीही राष्ट्रवादीकडूनही कधीतरी खाजगीत आम्हाला मुख्यमंत्री पद हवे असल्याची चर्चा सुरु होते. पण केवळ भाजपावर अंकुश ठेवण्यासाठी शिवसेनेला गृहमंत्री पद हवे असल्याचा गौप्यस्फोट केला.
तसेच जनतेची सेवा करण्यासाठी, कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी नको. याच सूड भावनेतून राज्याचा एक राजकीय पक्ष भाषा करत असेल तर आश्चर्य आहे असल्याचेही त्यांनी व्यक्त केले.
सुधीर मुनगंटीवार यांच्या वक्तव्याच्या अनुषंगाने शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनीही शिवसेनेकडे गृहमंत्री पद असायला हवे अशी भावना व्यक्त केली. त्यामुळे शिवसेनेला गृहमंत्री पद हवे असल्याच्या चर्चेने जोर धरला.
अखेर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी यासंदर्भात खुलासा करत काही प्रसारमाध्यांकडून सहकारी मंत्र्यांवर अविश्वास असल्याचे वृत्त प्रसारीत करण्यात येत आहे. मात्र मला माझ्या सहकाऱ्यांवर पूर्ण विश्वास असून ते उत्तम काम करत असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री कार्यालयाकडून अधिकृतरित्या देण्यात आली.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसकडून भाजपाच्या विरोधात कठोर कारवाई करण्याऐवजी मवाळ भूमिका घेण्यात येत असल्याचा आरोप शिवसेनेच्या काही आमदारांकडून करण्यात येत आहे. मात्र त्यावर अधिकृतरित्या कोणत्याही आमदाराने भाष्य केलेले नाही. मात्र त्याविषयीची कुजबुज जोरात सुरु आहे.

Exit mobile version