मुंबईः प्रतिनिधी
राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पिय अधिवेशन १ मार्चपासून मुंबईत होत असून पहिल्या आठवडाभराचे कामकाज निश्चित करण्यात आले आहे. २५ फेब्रुवारी २०२१ रोजी पुन्हा संसदीय कामकाज सल्लागार समितीची बैठक होणार असून त्यात पुढील कालावधीबाबतचा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी दिली.
अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे अभिभाषण, पुरवणी मागण्या, शोक प्रस्ताव आदीवर कामकाज होणार आहे. अर्थसंकल्प दुसऱ्या आठवड्यात होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.
विधिमंडळाचे अर्थसंकल्पिय अधिवेशन चार आठवडे चालणार होते. मात्र वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्याबाबतचा निर्णय नंतर घेण्याचे निश्चित करण्यात आले. त्यामुळे २५ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या बैठकीत कोरोनाची परिस्थिती पाहून निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अर्थसंकल्पिय अधिवेशनास उपस्थित राहणाऱ्यांना कोरोना चाचणी अनिर्वाय करण्यात आली आहे. मात्र कोरोनाचा प्रसार विधिमंडळ सदस्यांमध्ये होवू नये या उद्देशाने आरोग्य विभागातील काही तज्ञांनी दर तीन दिवसाला कोरोना चाचणी करावी अशी शिफारस करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
त्याचबरोबर विधानसभेचे अध्यक्ष पद रिक्त असल्याने त्यासंदर्भातील निवडणूकही याच अधिवेशनात होणार आहे. राज्य सरकार याबाबत निर्णय घेवून त्यानुसार औपचारीक विधानसभा अध्यक्षाची निवड करून त्याची माहिती राज्यपालांना कळविण्यात येणार असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले.
विधिमंडळाचे अर्थसंकल्पिय अधिवेशन १ तारखेपासून पण….
