मुंबईः प्रतिनिधी
राज्यात दुष्काळसदृष्य परिस्थिती असताना विरोधक याप्रश्नावर राजकारण करत आहेत. हा संवेदनशील मुद्दा असून दोघांनी मिळून जनतेचे प्रश्न सोडविले पाहिजे. तसेच या मुद्यावरून विरोधक खालच्या स्तराला जात असून यासंबधीचे राजकारण थांबविले पाहिजे असे आवाहन महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी करत कदाचीत विरोधक भांबावले असल्याने ते असे खालच्या पातळीवरचे राजकारण करत असल्याचा टोलाही त्यांनी लागावला.
मागील दोन दिवसांपासून विरोधकांकडून दुष्काळाच्या प्रश्नावरून राज्य सरकारला चांगलेच धारेवर धरले. त्याची दखल घेत मंत्री पाटील यांनी मंत्रालय व विधिमंडळात तातडीची पत्रकार परिषद घेत विरोधकांना प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला.
आगामी काळात पिण्याचा दुष्काळ मोठ्या प्रमाणावर राहणार आहे. त्यामुळे सर्वांनी मिळून काम केले पाहिजे. आघाडी सरकारला दुष्काळ या शब्दाची भीती होती. त्यामुळे त्यांनी नेहमी टंचाई सदृष्य परिस्थिती राज्यात जाहीर केली. मात्र आमच्या सरकारच्या काळात जनतेला, शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत मिळावी यासाठी ८१ तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आल्याचे सांगत सरकारच्या निर्णयाचे त्यांनी समर्थन केले.
साधारणतः जानेवारी महिना सुरु झाल्यानंतर आणेवारीची माहिती घेवून दुष्काळी परिस्थिती जाहीर करण्याबाबत निर्णय घेतला जात असे. मात्र त्यातही ते ५ ते ६ हजारच गावे दाखविले जात. परंतु आम्ही १८ हजार गावांमध्ये दुष्काळ जाहीर केला. तसेच आणेवारीची माहिती ऑक्टोंबर-नोव्हेंबर मध्येच घेवून दुष्काळ जाहीर केल्याचे त्यांनी सांगितले.
शिवसेनेने भाजपशी युती करावी
आतापर्यत भाजप-शिवसेनेने वेगवेगळ्या निवडणूका लढविल्या. मात्र प्रत्येक निवडणूकीत दोघांनी एकत्र येणे गरजेचे असल्याचे दिसून आले. त्यामुळे शिवसेनेने भाजपशी युती करावी म्हणून आम्ही खाजगीत बोलतच असतो. मात्र प्रसारमाध्यमांच्या माध्यमातूनही त्यांना युतीचा प्रस्ताव देत असल्याचे त्यांनी सांगितले.
आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणूका एकत्र लढल्या तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी पालापाचोळ्यासारखी उडून जाईल. तसेच भाजप-शिवसेनेचे सरकार पुन्हा आल्यास ते जनतेसाठी, राज्यासाठी आणि देशासाठी फायद्याचे ठरेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
दुष्काळावरून विरोधकांनी खालच्या पातळीवरील राजकारण थांबवावे
