Marathi e-Batmya

छगन भुजबळांचे आवाहन, नाशिकचे नाव बदनाम करू नका

मागील काही दिवसांपूर्वी रामगिरी महाराज यांच्या द्वेषमुलक वक्तव्यानंतर निर्माण झालेल्या कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नामुळे नाशिकसह छत्रपती संभाजी नगरात सामाजिक तणाव निर्माण झालेला आहे. त्यातच भाजपाच्या नेत्यांकडून रामगिरी महाराजाची पाठराखण केली आहे. त्यामुळे तणावात आणखीनच भर पडत आहे. यापार्श्वभूमीवर नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी नाशिकचे नाव बदनाम करू नका असे आवाहन नाशिककरांना केले.

नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ हे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी वरिल आवाहन केले.

यावेळी बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, नाशिक शहराचे नाव जागतिक पातळीवर पोहोचत आहे. तसेच येथे नवनवीन रोजगाराच्या संधी निर्माण होत आहेत. या परिस्थितीत नाशिकमध्ये सामाजिक सलोखा बिघडू देऊ नका. एकदा का शहराचे नाव खराब झाले तर अनेक उद्योग जे आहेत ते आणि जे येऊ पहात आहेत ते नाशिकमध्ये येणार नाहीत. त्यामुळे येथे रोजगाराचा प्रश्न निर्माण होईल अशी भीतीही यावेळी यावेळी व्यक्त केली.

छगन भुजबळ पुढे बोलताना म्हणाले की, निर्माण झालेल्या तणावग्रस्त परिस्थितीवर पोलिसांनी जीवाची बाजी लावून नियंत्रण मिळवले आहे. त्या बद्दल पोलिसांचे खरंच मनपूर्वक धन्यवाद मानतो. पण माझे एक आवाहन असून नाशिक शहराला उगाच बदनाम करू नका, एकदा शहराचे नाव बदनाम झाले तर ते पुन्हा चांगले व्हायला बराच वेळ लागेल. तसेच त्यामुळे शहराचे मोठे नुकसानही होईल असेही यावेळी सांगितले.

दरम्यान, रामगिरी महाराज यांना काही प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी संपर्क साधला असता त्यांनी केलेल्या वक्तव्यावरून सारवा सारव केली, मात्र केलेल्या वक्तव्यावर ठाम असल्याचे सांगत त्यापासून माघार घेण्यास नकार दिला.

Exit mobile version