Marathi e-Batmya

मुख्यमंत्री म्हणतात, चव्हाणांसह काँग्रेसच्या आमदारांनो भाजपात या

मुंबईः प्रतिनिधी
आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या आमदारांना भाजपात येण्यासाठी मुख्यमंत्री काँग्रेस आमदारांना रोज सतत फोन करत असल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला.
इतकंच नाही तर राज्यातल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस फोडण्याचा प्रयत्नही मुख्यमंत्री आणि भाजपातले इतर नेते करत असून राष्ट्रवादी भाजपाला मदत करत असल्याचा आरोपही अशोक चव्हाण यांनी केला. ऐनवेळी विधानसभा निवडणूक तोंडावर आलेली असताना या आरोपांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
एकीकडे राधाकृष्ण विखे पाटील हे भाजपाच्या वाटेवर आहेत. त्यांचा मुलगा सुजय विखे पाटील यांनी भाजपात प्रवेश केला आणि अहमदनगरमधून ते भाजपाच्या तिकिटावर खासदारही झाले. त्यामुळे आता राधाकृष्ण विखे पाटील हेदेखील भाजपात जाणार हे नक्की झाले आहे. अशात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काँग्रेस फोडण्याचा प्रयत्न करत असून आणि मला भाजपात येण्यासाठी फोन करत आहेत असा खळबळजनक आरोपही त्यांनी केला.
दरम्यान काही कार्यकर्त्यांनी काँग्रेसने निवडणूक स्वबळावर लढावी असा ठरावही मांडण्यात आला. मात्र त्याबाबत चर्चा करून ठरवू तूर्तास तरी आघाडीत काहीही बिघाडी नाही असं स्पष्ट करण्यात आलं. वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकरांना आम्ही सोबत घेण्यासंबंधी विचार करतो आहोत. त्याबाबत त्यांच्याशी चर्चाही करू मात्र अंतिम निर्णय त्यांना घ्यायचा आहे असेही ते म्हणाले.

Exit mobile version