अर्थसंकल्पिय अधिवेशाच्या पूर्वसंध्येला राज्य सरकारकडून आयोजित चहापानाच्या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, नरहरी झिरवळ यांच्या कार्यालयात पैसे घेण्याचा जो काही प्रकार झाला. त्यामध्ये अद्याप तरी नरहरी झिरवळ यांच्या विरोधात कोणतेही पुरावे मिळाले नाहीत. अन्यथा त्यांचा राजीनामा घेतला असता असे सांगितले.
तसेच पुढे बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला मोकळीक दिलेली आहे. त्यामुळे फक्त नरहरी झिरवळ यांच्या कार्यालात जाऊन अशी कारवाई केली आहे असे नाही. उद्या जाऊन माझ्याही कार्यालयातील कोणी पैसे घेत असेल तर माझ्याही कार्यालयात एसीबीकडून धाड टाकली जाऊ शकते. एसीबीला पुरेशी मोकळीक दिलेली असल्याचेही पुढे बोलताना सांगितले.
#LIVE | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 'महाराष्ट्र विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशन 2026'च्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषद@Dev_Fadnavis #Maharashtra #DevendraFadnavis #MahaBudgetSession2026 https://t.co/UW4XlZ6Fje
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) February 22, 2026
यावेळी अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्याकडून अनेक प्रश्न उपस्थित केले जात असल्याबाबत विचारले असता मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, खरंतर तर अजित पवार यांच्या अपघाती मूत्यूचे दुःख सगळ्यांनाच आहे. विशेषतः त्यांच्या इतरांपेक्षा त्यांच्या कुटुंबियांना जास्त आहे. त्यामुळे त्यांच्यासह इतरांच्या मनात जी काही शंका असेल ती आम्हाला कळवावी आम्ही ती शंका डीजीसीएला कळवू. जेणे करून त्या अंगानेही तपास व्हावा त्यातील माहिती पुढे यावी.
पुढे बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, यापूर्वी आपण अर्थात राज्य सरकारकडून सीआयडीकडून या अपघाताची चौकशी सुरु करण्यात आली. मात्र राष्ट्रवादीकडून सीबीआय चौकशीची मागणी करण्यात आली. त्यामुळे मी स्वतः केंद्रीय गृहमंत्र्यांशी स्वतः बोललो व तसे पत्रही पाठविले असल्याचे सांगितले.
मुख्यमंत्री फडणवीस पुढे बोलताना म्हणाले की, डीजीसीएकडून आधीच १९ गृहीतकांच्या आधारे चौकशी सुरु आहे. त्यामुळे या विमान अपघाताची जी काही माहिती पुढे येईल त्याचा फायदा सर्व पक्षांच्या राजकीय नेत्यांना होईल. त्यामुळे या प्रकरणी जी काही शंका असेल ती शंका कोणीही सांगावी त्यानुसार तपास करण्यासाठी आम्ही पुढाकार घेऊ परंतु पवार कुटुंबियांना त्रास होईल अशी कोणतीही गोष्ट या तपासाच्या निमित्ताने अथवा शंकेच्या निमित्ताने व्हायला नको असे आवाहनही यावेळी केले.
