Marathi e-Batmya

राहुल गांधी म्हणाले, सीबीआय-ईडीच्या भीती पोटी मायावतींनी हे सगळं केलं

नुकत्याच पंजाबसह पाच राज्यात झालेल्या विधानसभा निवडणूकीत काँग्रेसचा सपाटून पराभव झाला. परंतु निवडणूक काळात उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणूकीकरीता युतीसाठी बहुजन समाज पार्टीला विचारणा करण्यात आल्याचा गौप्यस्फोट काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला. युतीसाठी त्यांना मेसेजही केला. पण त्या काहीच बोलल्या नाहीत. मात्र त्यांना सीबीआय ईडीची भीतीने त्यांनी युती केली नसावी असेही सांगायला ते विसरले नाहीत.

नवी दिल्लीतील जवाहर भवन येथे ‘दलित ट्रुथ-बॅटल फॉर रिअलायझिंग आंबेडकर्स व्हिजन’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते.

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी बसपा प्रमुख मायावती यांना युतीची ऑफर दिली होती. मी मायावतींना मेसेज पाठवला होता, मात्र सीबीआय आणि ईडीच्या भीतीने त्यांनी काँग्रेससोबत युपी विधानसभा निवडणूक लढवली नाही असेही ते म्हणाले.

ज्यांनी, कांशीरामजींनी, प्राणाचे बलिदान देत कष्टाने आणि मेहनतीने उत्तर प्रदेशात दलितांचा आवाज जागवला. त्यामुळे काँग्रेसचे नुकसान झाले ही वेगळी बाब आहे. परंतु त्या आवाजासाठी मी लढणार नाही, असे आज मायावती म्हणतात. सीबीआयच्या भीतीपोटी मायावतींनी हे सगळं केल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी बोलताना राहुल गांधी म्हणाले की, एक प्रकारे मी भिकारीच आहे, कारण माझ्या देशाने मला विनाकारण प्रेम दिले आहे. मी त्यांचा ऋणी आहे. मी रोज सकाळी उठतो आणि विचारतो की मला देशाकडून मिळालेले हे प्रेम कसं परत करायचे?, देशाने मला केवळ प्रेमच दिले नाही, तर देशाने मला जोडेदेखील मारले. देशाने मला मोठ्या हिंसाचाराने मारले आहे. मला वाटलं असं का होतंय? त्याचे उत्तर मला मिळाले की माझ्या देशाला मला शिकवायचं आहे. देश मला सांगत आहे की शिक, समजून घे. दुःख असेल तर ते सहन कर पण शिक आणि समजून घे अशी भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

Exit mobile version