Marathi e-Batmya

राहुल गांधी यांनी बंगला केला रिकामा चावी देताना म्हणाले, खरं बोलण्याची किंमत…

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत केलेल्या एका वक्तव्यामुळे सुरत न्यायालयानं त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर त्यांची खासदारकी रद्द झाली. त्यानंतर लोकसभा सचिवालयाने राहुल गांधी यांना ३० एप्रिलपर्यंत बंगला रिकामा करण्याची मुदत दिली होती. त्यानुसार ३० एप्रिलपूर्वीच राहुल गांधी यांनी बंगला रिक्त करत आज स्वतः बंगल्याला कुलुप लावत त्याची चावी लोकसभा हाऊस कमिटीच्या अधिकाऱ्याच्या हाती चाव्या सुपुर्द केल्या. बंगला सोडताना राहुल गांधी म्हणाले की, खरं बोलण्याची किंमत मोजावीच लागेल, आणि मी ती मोजत राहीन.

राहुल त्यांचा बंगला सोडताना त्यांची बहीण आणि काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी देखील तिथे हजर होत्या. तसेच राहुल यांच्या आई सोनिया गांधी आणि राज्यसभा खासदार के. सी. वेणुगोपालही राहुल यांच्या निवासस्थानी पोहोचले होते.

राहुल गांधी बंगला रिकामा करताना भावूक झाल्याचं पाहायला मिळालं, त्यावेळी ते म्हणाले की, हे घर त्यांना देशातील जनतेने दिलं होतं. या घरात ते १९ वर्षांपासून राहत होते. परंतु केंद्र सरकारने त्यांच्याकडून हा बंगला हिसकावून घेतला आहे. तरीदेखील मी सरकारविरोधात खरं बोलणं सुरूच ठेवणार आहे.

राहुल गांधी यांनी १२ तुघलक लेन येथील सरकारी बंगला रिकामा केला. आज त्यांनी संबंधित सरकारी अधिकाऱ्याला बंगल्याची चावी सुपूर्द केली. यावेळी त्यांच्यासोबत प्रियांका गांधी वाड्रादेखील होत्या.

यावेळी माध्यमांशी बोलताना प्रियांका गांधी म्हणाल्या की, आम्ही या अशा कृत्यांना घाबरणार नाही आणि जनतेचे प्रश्न मांडतच राहू. राहुल सरकारबद्दल खरं बोलत आहेत, म्हणूनच त्यांच्यासोबत हे घडतंय. राहुल खूप हिंमतवान आहेत, ते कोणालाही घबरत नाहीत. न घाबरता ते त्यांचा संघर्ष सुरू ठेवतील.

Exit mobile version