Marathi e-Batmya

आचारसंहिता भंग करणाऱ्या पंतप्रधानांवर आयोगाने कारवाई करण्याची हिंमत दाखवावी!

मुंबईः प्रतिनिधी
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे घटना, कायदे, प्रथा व परंपरा मानणारे म्हणून कधीच प्रसिद्ध नव्हते. या निवडणुकांच्या काळात देखील त्यांनी हेच सिद्ध करण्याचा चंग बांधला आहे, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष व प्रवक्ते डॉ. रत्नाकर महाजन यांनी केला आहे.
मिरवणुकीने मतदानाला जाणे किंवा मतदान करुन आल्यानंतर एक बोट वर करुन मिरवणुकीने मतदान केंद्राच्या बाहेर पडणे हा त्यांचा आवडता खेळ राहिला आहे. निवडणूक आचार संहितेप्रमाणे हा गैरप्रकार असून त्यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा नोंदला जाऊ शकतो. दुर्दैवाने नरेंद्र मोदींच्या दहशतीखाली सर्व केंद्रीय संस्था या बोटचेपेपणाने वागत असल्याने निवडणूक आयोगाने देखील याचा केवळ अहवाल मागविला आहे. पण यापुढे निवडणूक आयोग त्यांच्यावर प्रचारबंदी किंवा तत्सम काही कारवाई करील असा विश्वास लोकांना वाटत नाही. आपली विश्वासार्हता पुन्हा मिळवायची असेल तर निवडणूक आयोगाने मोदींनी याआधी केलेल्या आचारसंहिता भंगाच्या सर्व प्रकाराची दखल घेऊन त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.

Exit mobile version