Marathi e-Batmya

नौदलाचा अवमान करणाऱ्या नितीन गडकरींनी माफी मागावी

मुंबई: प्रतिनिधी

मुंबईतील एका कार्यक्रमात नौदल अधिकाऱ्यांना एक इंचही जमिन देणार नाही. त्यांना दक्षिण मुंबईत जागा लगाते कशाला असा सवाल करत त्यांनी पाकिस्तान आणि चीनच्या सीमेवर जावे असे सांगत नौदलाचे काम असल्याचे उद्दाम वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी करून भारतीय नौदलाचा अवमान केला आहे. काँग्रेस पक्ष त्यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दात जाहीर निषेध करीत असून त्यांनी  नौदलाची  माफी मागावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केली.

मुंबईत नौदल अधिकाऱ्यांना एक इंचही जमिन न देण्याची भाषा ही सत्तेच्या उन्मादातून येते. सत्तेची नशा भाजपच्या नेत्यांच्या डोक्यात गेली असल्यानेच त्यांच्याकडून वारंवार अशी वक्तव्ये केली जात आहेत. मुंबईच्या सुरक्षेसाठी धोका ठरू शकणा-या तरंगत्या हॉटेलसाठी नितीन गडकरी एवढे आग्रही का आहेत? गडकरींना या तरंगत्या हॉटेलात एवढा रस का आहे? असा सवाल करत याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली.

भाजपाचा राष्ट्रवाद हा भोंगळ असून तो खाजगी व्यापाऱ्यांकरीता लागू होत नाही असा टोला सावंत यांनी लगावला. काँग्रेस पक्षाला आणि भारताच्या सर्व नागरिकांना भारतीय नौदलाचा अभिमान आहे. २६/११च्या पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर मुंबईच्या सुरक्षेसाठी अधिक काळजी घेतली पाहिजे. या अगोदरही मुंबईच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून दक्षिण मुंबईतील हेलीपॅडसारख्या व पुर्ननिर्माण प्रकल्पांना भारतीय नौदलाने आक्षेप घेतला होता. मुंबई देशाची आर्थिक राजधानी असल्याने पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर आहे. मुंबईच्या सुरक्षेसाठी मुंबईत नौदल असणे आवश्यक आहे. नौदलाबद्दल उद्दाम भाषा वापरून नौदल अधिका-यांचे मानसिक खच्चीकरण करत केंद्रीय मंत्रीपदावर असलेल्या नितीन गडकरींना एकप्रकारे पाकिस्तानला मदत करायची आहे का? असा संतप्त सवालही त्यांनी यावेळी केला.

Exit mobile version