Marathi e-Batmya

राहुल गांधीही १३ तारखेला मुंबईत

मुंबईः प्रतिनिधी
राज्यातील विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापाठोपाठ काँग्रेस नेते राहुल गांधी हे ही १३ ऑक्टोंबरला मुंबईच्या दौऱ्यावर येत आहेत. या एकाच दिवशी ते लातूर जिल्ह्यातील औसा, मुंबईतील चांदिवली आणि धारावी येथे त्यांची काँग्रेस उमेदवारांसाठी प्रचारसभा होणार आहे.
मुंबईतील दोन मतदारसंघातील काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार नसीम खान, वर्षा गायकवाड आणि औसाच्या उमेदवारासाठी प्रचारसभा होणार आहे.
लोकमान्य टिळकनगर, ९० फूट रोड, साकिनाका येथे संध्याकाळी ५ वाजता ही सभा होणार आहे. राहुल गांधी यांच्या सभेसाठी जय्यत तयारी सुरु आहे. पंजाब आणि महाराष्ट्र बँकेचा घोटाळा, आरेमधील झाडांची कत्तल, बेरोजगारी तसेच युती सरकारच्या भ्रष्ट कारभारावर राहुल गांधी तोफ डागतील, अशी माहिती काँग्रेस उमेदवार नसीम खान यांनी दिली.
राहुल गांधी यांच्या सभेसाठी चांदिवली मतदारसंघातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह असल्याचे नसीम खान यांनी सांगितले. राहुल गांधी यांचे मार्गदर्शन आमच्यासाठी मोलाचे तसेच प्रेरणा देणारे असते. जागतिक किर्तीचे शहर म्हणून ज्या मुंबई शहराचा लौकीक होता त्याला भाजप-शिवसेनेच्या सरकारने काळीमा फासला असून मुंबईची वाटचाल बकाल शहराकडे झालेली आहे. विकासात मुंबईसह महाराष्ट्राची अधोगती झालेली आहे, आपल्यापेक्षा इतर राज्यांनी विकासामध्ये आघाडी घेतली असून युती सरकारचा नियोजनशून्य कारभार यासाठी कारणीभूत आहे. या सर्व मुद्द्यांना राहुल गांधी भाषणात हात घालतील असेही नसीम खान म्हणाले.

Exit mobile version