Marathi e-Batmya

मुख्यमंत्री ठाकरेंनी लिहिले पंतप्रधान मोदींना पत्र, म्हणाले हस्तक्षेप करा

मुंबई: प्रतिनिधी
राज्यात कोरोना विषाणूचा प्रसार दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया परिक्षा घेण्याबाबत मार्गदर्शक तत्वे जाहीर करत जुलै महिन्यात परिक्षा घेण्यास सांगितले. मात्र कोरोनाच्या वाढत्या प्रसाराच्या पार्श्वभूमीवर या विद्यार्थ्यांची परिक्षा आयोजित केली तर प्रत्यक्ष रूग्णालयांमध्ये कोरोनाग्रस्तांवरील उपचारासाठी डॉक्टरांची कमतरता जाणवेल. त्यामुळे या परिक्षा पुढे ढकल्यासाठी आपण हस्तक्षेप करावा अशी मागणी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पत्र पाठवित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली.
जुलै ६ किंवा १६ जुलै पासून मेडिकलच्या विद्यार्थ्यांची परिक्षा घ्यायचा निर्णय सुरुवातीला राज्य सरकारने घेतला होता. मात्र दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. या परिस्थितीत मेडिकलच्या शेवटच्या वर्षाला असलेल्या विद्यार्थ्यांची परिक्षा घेतल्यास डॉक्टरांची कमतरता जाणवू शकते. तसेच मेडिकलच्या सामायिक प्रवेश परिक्षा जाहीर केल्यास त्यामुळेही प्रशासन आणि डॉक्टरांची कमतरता निर्माण होवू शकते. अशा परिस्थितीत या परिक्षा घेण्याऐवजी त्या डिसेंबर पर्यंत पुढे ढकलाव्यात आणि शेवटच्या वर्षाच्या डॉक्टरांच्या परिक्षा झाल्यानंतर सामाईक परिक्षा घ्यावी अशी मागणीही त्यांनी पत्राद्वारे केली.

 

Exit mobile version