मुंबई: प्रतिनिधी
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊन जारी करण्यात आला. या लॉकडाऊनमुळे कोरोनाबाधीतांची संख्या नियंत्रणात ठेवता आले. मात्र ३ मे नंतर राज्यातील रेड झोन वगळता अर्थात मुंबई महानगर, पुणे महानगर, नागपूर आणि परिसरातील काही भाग वगळता ऑरेंज आणि ग्रीन जिल्ह्यातील लॉकडाऊनमध्ये टप्प्या टप्याने शिथिलता आणणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज दिली.
१ मे महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील जनतेला समाजमाध्यमातून संवाद साधताना त्यांनी वरील माहिती दिली.
कोरोनाला रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. तरीही अनेक भागात बाधीतांची संख्या वाढताना दिसते. मात्र ही संख्या जी काही वाढली ती त्यांना माहित नव्हते की त्यांना कोरोनाची लागण झालीय. परंतु ८० टक्क्याहून अधिक लोकांना कोरोनाची तीव्र लक्षणे नाहीत, त्यांच्या जी काही लक्षणे आहेत ती अल्प प्रमाणात दिसणारी असून काहीजणांना तर लक्षणेच दिसत नाहीत. मात्र त्यांना कोरोनाची लागण झालेली आहे. या आजारावर उपचार होत आहेत. रूग्ण बरे होवून घरी जात आहेत. त्यामुळे आपण कोरोनाला नियंत्रित करू शकलो आहोत. तसेच सध्या जी काही तयारी दिसत आहे, ती केवळ आपण चाचणी करत असताना आढळून येणाऱ्या रूग्णांसाठी असून आपण सावधपणाने पावले टाकतोय म्हणून ही तयारी असल्याचेही त्यांनी सांगितले.
राज्यात असलेल्या परप्रांतीय कामगारांना त्यांच्या राज्यात पोहोचविणार असून त्याबाबतची तयारी करण्याची जबाबदारी आपण जिल्ह्याच्या नोडल अधिकाऱ्यांवर सोपविली आहे. मात्र घरी जायचे म्हणून कोणी झुंबड उडवेल तर दिलेल्या सवलती काढून घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
याशिवाय ग्रीन आणि ऑरेंज झोनमधील दैंनदिन जीवन सुरुळीत व्हावे, त्यांची रखडलेली कामे व्हावीत यादृष्टीने लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणणार आहे. मात्र शिथिलता टप्प्याने आणणार असून एकदम सर्वच अटी काढून घेतल्या जाणार नाहीत. याकालावधीत अनेकांचे रोजगार बुडाले असणार आहेत. अनेकांच्या नोकऱ्यांवर गदा आल्याची शक्यता असणार आहे. मात्र कोणत्याही राज्यासाठी त्याची जनता महत्वाची असते. त्यामुळे नागरिकांचा जीव वाचविणे महत्वाचे असल्यानेच लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगत झालेले आर्थिक नुकसान आपण सगळेजण मिळून भरून काढू असा दिलासाही त्यांनी यावेळी दिला.
रेड झोन वगळता ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये लॉकडाऊन शिथील
