मुंबई: विशेष प्रतिनिधी
लॉकडाऊनमुळे अडचणीत सापडलेल्या कामगारांनी पायीच आपले घर गाठण्यासाठी रेल्वे रूळाच्या सोबत निघाले. मात्र पहाटेच्या अंधारात रेल्वे मालवाहतूक गाडीने त्यांच्या जीवाचा ठाव घेतला. या घटनेमुळे राज्यातील प्रशासकिय व्यवस्था, कामगार विभाग आणि नोडल अधिकाऱ्यांची यंत्रणा नेमके काय काम करते असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
राज्य सरकारने स्थलांतरीत कामगारांना त्यांच्या घरी सुरक्षित पोहोचविण्यासाठी त्यांच्याकडून अर्ज भरून घेण्याची प्रक्रिया सुरु केली. मात्र त्याची जबाबदारी पोलिस खात्यावर सोपविली. संबधित नोडल अधिकाऱ्यांकडून अर्जाचा नमूना घ्यायचा तो भरायचा आणि जमा करायचा पोलिस स्टेशनला किंवा आताच्या नव्या नियमानुसार जिल्हा रूग्णालयात-सरकारी रूग्णालयात जावून स्वत:ची चाचणी केल्यानंतर कामगाराचे नाव यादीत समाविष्ट करून ती यादी नोडल अधिकाऱ्यांकडे सादर करणे आदी गोष्टींची थोडीशी सोयीची आणि किचकट प्रक्रिया सुरु करण्यात आली.
परंतु या प्रक्रियेची माहिती या स्थलांतरीत कामगारांपर्यंत पोहोचविण्यासाठी कामगार विभागातील कोणता अधिकारी गेला नाही. तसेच नोडल अधिकाऱ्यांकडून तशी व्यवस्था करण्यात आली नाही. परिणामी अनेक कामगारांना आपल्यासाठी सरकार मूळ गावी जाण्यासाठी वाहनाची अर्थात रेल्वे-बसची व्यवस्था करतेय याची माहितीच नसल्याचे दिसून येत आहे. जरी झाली असेल तर स्वत:ला चाचणी करून घेण्यासाठी कुठे जायचे? तिथे गेल्यानंतर कोरोना आजाराची लागण झाल्याचे सिध्द झाले तर मग पुन्हा इथेच रहावे लागेल अशी एकप्रकारची भीती या कामगारांमध्ये निर्माण झाली आहे. तसेच लॉकडाऊनमुळे पुन्हा उद्योग कधी सुरू होतील? रोजगार मिळेल का? खिशातले पैसे संपत आलेत ? या सगळ्या पार्श्वभूमीवर हा धास्तावलेला कामगार कमालीचा बैचेन आहे. त्यामुळे तो मिळल्या मार्गाने गाव-घर गाठण्यासाठी प्रयत्न करत आहे. यासर्व कामगारांना दिलासा देण्यासाठी त्यांच्यात राज्य सरकारप्रती विश्वास निर्माण करण्यासाठी कामगार विभागाकडून नियुक्त करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांकडून फारसे प्रयत्न करण्यात आले नसल्याची माहिती मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
सद्यपरिस्थिीत महाराष्ट्रातून १ लाख ८२ हजार २४२ कामगारांनी आपल्या मूळ गावी-राज्यात जाण्यासाठी राज्य सरकारकडे नोंदणी केली आहे. यातील सर्वाधित कामगार हे बिहार, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, झारखंड, मध्य प्रदेश, कर्नाटक, छत्तीसगड, राजस्थान आदी राज्यातील कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहेत. सर्वाधिक कामगार सध्या पुणे, कोल्हापूर, मुंबई, ठाणे, औरंगाबाद, मुंबई उपनगर, सिंधूदुर्ग, नागपूर जिल्ह्यात आहेत.
जिल्हानिहाय स्थलांतरीत कामगारांची संख्या
महाराष्ट्रातून किती स्थलांतरीत कामगार जाणार आहेत? जाणून घ्या
