नवी दिल्ली-मुंबई: विशेष प्रतिनिधी
मागील तीन टप्प्यात लॉकडाऊन होता. मात्र त्या सर्वांपेक्षा वेगळा आणि नवा लॉकडाऊनचा ४ था टप्पा सुरु होणार आहे. देशातील रस्त्यावर विक्री करणारा, फुटपाथवरचा ठेलेवाला यांच्यासह कुटीरोद्योग, लघु उद्योग, गृह उद्योग, छोटे-मोठे उद्योग यासह संपूर्ण उद्योग जगातासाठी २० लाख कोटी रूपयांचे विशेष आर्थिक पॅकेज भविष्यकाळात देशाला आत्मनिर्भर करण्यासाठी देण्यात येत असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.
२१ वे शतक हे भारताचे शतक राहणार असून कोरोना संकटाचे संधीत रूपांतर करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. या कालावधीत १३० कोटी जनतेच्या मदतीने देशाला आत्मनिर्भर बनविण्याचा संकल्प आहे. त्यासाठी स्थानिक पातळीवरील उद्योगांना अर्थात मेक इन इंडिया संकल्पनेला मोठ्या प्रमाणावर अस्तित्वात आणण्यासाठी याचा उपयोग होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यापूर्वी देशातील उद्योगजगत आणि नागरिकांसाठी यापूर्वी जाहीर करण्यात आलेले १. ५० लाख कोटींचे आर्थिक पॅकेज रिझर्व्ह बँकेने दिलेल्या पॅकेजचा यात समावेश राहणार आहे. देशाच्या एकूण जीडीपीच्या १० टक्के रकमेचे हे आर्थिक पॅकेज आहे. तसेच जमिन, कामगार, दिवाळखोरी आदी बाबींचा समावेशही या पॅकेजमध्ये करण्यात आल्याचे सांगत कामगार, शेतकऱ्यांसाठी, घरकामगारांसाठी हे पॅकेज महत्वाचे राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
देशाला आत्मनिर्भर करण्यसाठी स्थानिक लोकल उत्पादनांवर त्यांच्या ब्रॅण्डींगवर भर देण्यात येणार असून त्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करायला हवे असे आवाहनही त्यांनी केले.
देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी महत्वाच्या पाच पिलर्स-अर्थव्यवस्था-कंट्रोम्पलाय जम्प, पायाभूत सुविधा-आधुनिक भारताची ओळख, व्यवस्था-गतकाळातील नव्हे तर २१ व्या शतकातील स्वप्ने साकार करणारी, डेमोग्राफी-व्हायब्रंट ताकद उर्जेचा स्त्रोत, डिमांड- सप्लायची मजबूतीकरण आदी गोष्टींवर सरकारकडून भर देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
नवे रंगरूप ४ था लॉकडाऊन राहणार असून राज्य सरकारने केलेल्या सूचनानुसार हा लॉकडाऊन राहणार आहे. तसेच आर्थिक पॅकेजचे सविस्तर माहीती अर्थमंत्री निर्मला सितारामण या लवकरच माहिती देणार असून ४ थ्या टप्प्यातील लॉक़डाऊनची नियमावली काय असेल त्याची माहितीही १८ मे पूर्वी जाहीर करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यापूर्वी पीपीई किट, ल-१९ मास्क आपल्या देशात बनत नव्हते. मात्र आता दिवसाला २ लाख मास्क आणि पीपीई किटचे उत्पादन देशात तयार होत असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
२० लाख कोटींच्या आर्थिक पॅकेजसोबत ४ था लॉकडाऊन १८ मेपासून
