Marathi e-Batmya

रामदास कदम यांचा उध्दव ठाकरे यांच्यावर निशाणा, मंत्रालयात जाण्याची गिनीज बुकात नोंद..

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वावर टीका करत एकनाथ शिंदे यांच्या पाठोपाठ शिवसेनेतून बाहेर पडलेले नेते रामदास कदम यांच्याकडूनही आता उध्दव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सुरु केले आहे. त्यामुळे उध्दव ठाकरे यांच्यावर आम्ही कधीही टीका करणार नाही हे वाक्य बंडखोर आमदार आणि नेतेच विसरत असल्याचे दिसून येत आहे. यापार्श्वभूमीवर रामदास कदम यांनी उध्दव ठाकरे यांच्यावर टाका करताना म्हणाले की, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना केवळ तीनदाच मंत्रालयात आले. त्यामुळे त्यांची अगदी गिनीज बुकमध्ये नोंद झाली, असा खोचक टोला लगावला.

रामदास कदम म्हणाले, स्वत:साठी जगला तो मेला, दुसऱ्यांसाठी जगला तो खऱ्या अर्थाने जगला. असं काम मुख्यमंत्री शिंदे यांचं सुरू आहे. तातडीने निर्णय घेतले जात आहेत. दिवसरात्रं काम करत आहेत, मंत्रालयात लोकाना भेटत आहेत. त्यांच्या निवासस्थानी देखील नागरिकांना भेटत आहेत.

या अगोदरचे मुख्यमंत्री अडीच वर्षात केवळ तीनदा मंत्रालयात आले होते. अगदी गिनीज बुकात त्यांची नोंद झाली. मुख्यमंत्री कसा असावा, त्यांचा कामाचा सपाटा कसा असावा? हे एकनाथ शिंदेंनी दाखवून दिलं आहे. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे दोघेहीजण अनुभवी आहेत, असंही यावेळी कदम यांनी बोलून दाखवलं.

शिवसेना नेतेपदाचा राजीमाना देऊन रामदास कदम शिंदे गटात सहभागी झाले आहेत. त्या अगोदर त्यांच्यावर कठोर कारवाई करत, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कदम यांची पक्षातून हकालपट्टी केली होती. मागील बऱ्याच काळापासून रामदास कदम हे शिवसेना नेतृत्वावर नाराज होते. वेळोवेळी त्यांनी जाहीरपणे याबाबत बोलूनही दाखवलं होतं. पत्रकारपरिषदेतून आपलं दु:ख देखील त्यांनी मांडलं होतं. अखेर एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर कदम यांनी देखील शिवसेनेच्या नेते पदाचा राजीनामा दिला व ते शिंदे गटात गेले.

Exit mobile version