महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे रविवार, दिनांक २८ जून २०२६ रोजी राज्यभरातील १०२८ केंद्रांवर आयोजित करण्यात आलेली ‘शिक्षण पात्रता परीक्षा’ (TET) २०२६ पेपरफुटीची घटना घडल्याने पुढे ढकलण्यात आली आहे. या प्रकरणाची राज्य शासनाने गंभीर दखल घेतली असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिली.
शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले की, भिवंडी येथे काही संशयितांकडे टीईटी परीक्षेची प्रश्नपत्रिका असल्याची गोपनीय माहिती पोलीस प्रशासनाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे भिवंडी पोलिसांनी धाड टाकून संबंधित संशयितांना ताब्यात घेतले. पोलिसांनी जप्त केलेल्या प्रश्नपत्रिकेची महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांकडून पडताळणी करण्यात आली. यात जप्त करण्यात आलेल्या प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न हे उद्या होणाऱ्या प्रत्यक्ष परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांशी समान असल्याचे आढळून आले आहे. या गंभीर बाबीची दखल घेऊन भिवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विद्यार्थ्यांना नव्याने नोंदणीची आवश्यकता नाही
पुढे बोलताना दादाजी भुसे म्हणाले की, विद्यार्थ्यांचे हित आणि परीक्षेची पारदर्शकता जपण्यासाठी २८ जून रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी होणे आवश्यक असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच त्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना नव्याने नोंदणी किंवा शुल्क भरण्याची आवश्यकता नाही, असेही सांगितले. तसेच परीक्षेची नवीन तारीख लवकरच जाहीर केली जाईल, असेही यावेळी स्पष्ट केले.
शेवटी मंत्री दादाजी भुसे म्हणाले, या संपूर्ण प्रकरणाची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासह शालेय शिक्षण विभागाने गंभीर दखल घेतली असून पोलीस प्रशासनाला सखोल चौकशीचे आदेश दिले असल्याचे यावेळी सांगितले.
