Marathi e-Batmya

के चंद्रशेखर राव यांची टीका, देशात आणिबाणीपेक्षा वाईट….

दिल्ली सरकारवर नियंत्रण आणण्याच्या अध्यादेशाविरोधात विरोधकांचा पाठिंबा मिळवण्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल नेत्यांची भेटीगाठी घेत आहेत. शनिवारी २७ मे रोजी केजरीवाल यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव ( केसीआर ) यांची हैदराबाद येथे भेट घेतली. यावेळी के चंद्रशेखर राव यांनी केंद्र सरकारने काढलेल्या अध्यादेशाविरोधात अरविंद केजरीवाल यांना पाठिंबा दर्शवला. यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना के चंद्रशेखर राव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर हल्लाबोल केला.

यावेळी बोलताना के.चंद्रशेखर राव म्हणाले, पंतप्रधान मोदींनी अध्यादेश मागे घ्यावा, अशी आमची मागणी आहे. देशात आणीबाणीपेक्षाही वाईट परिस्थिती आहे. जनतेने निवडून दिलेल्या सरकारला तुम्ही ( मोदी सरकार ) काम करून देत नाही, असा आरोपही केला.
आम्ही नरेंद्र मोदींना अध्यादेश मागे घेण्याची मागणी करतो. आमचा अरविंद केजरीवाल यांना पाठिंबा आहे. मोदी सरकारने दिल्लीतील नागरिकांचा अपमान केला आहे. हा जनतेच्या जनादेशाचा अपमान आहे. केंद्राने अध्यादेश मागे घ्यावा, अन्यथा आम्ही एकजुटीने लढा देऊ, असं के चंद्रशेखर राव यांनी सांगितले.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही मोदी सरकारवर टीका करताना म्हणाले, ८ वर्षे दिल्लीतील लोकांना अपंग करून ठेवलं. ८ वर्ष लढाई लढल्यानंतर ११ मेला सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने लोकांच्या हक्काचा निर्णय दिला. त्यामुळे दिल्लीतील लोकांना न्याय मिळाला होता. पण, ८ दिवसांच्या आताच केंद्र सरकारने अध्यादेश आणून सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय बदलला, असा हल्लाबोल केला.

पुढे बोलताना मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले, देशाचे पंतप्रधानच सर्वोच्च न्यायालयाचे आदेश मानत नाहीत. तसेच, अध्यादेश आणून निर्णय बदलतात. तर, न्यायासाठी लोकांनी कोणाकडं जायचं. देश कसा चालणार? हे चुकीचं आहे, असं म्हणाले.

Exit mobile version