Marathi e-Batmya

माझ्या विरोधाचा अर्कच वेगळा

नागपूर : प्रतिनिधी

राज्यातील सत्ताधारी असलेल्या भाजपला कोणताही मदतीचा हात राष्ट्रवादी काँग्रेसकडून दिला जात नसून विधिमंडळात आणि विधिमंडळाबाहेर सातत्याने राज्य सरकारच्या धोरणावर टीका करण्यात येत आहे. यात पक्षाचे ज्येष्ठ नेते अजित पवार, जयंत पाटील आदींकडूनही टीका करण्यात येते. मात्र माझ्या विरोधाचा अर्कच वेगळा असून तो आतूनच येत असल्याचे प्रतिपादन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केले.

सुयोग या पत्रकारांच्या निवासस्थानी भेटी करीता आले असता मुंडे यांनी वरील प्रतिपादन केले.

मी यापूर्वीही अर्थात पूर्वाश्रमीच्या पक्षात असतानाही पक्षच विरोधी पक्ष होता. त्यानंतर मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलो. आता हा पक्षही विरोधी पक्षात आहे. याउलट अजितदादा पवार, जयंत पाटील, सुनिल तटकरे ही वरिष्ठ नेते मंडळी सत्तेत होती. ते ही सरकारच्या धोरणावर टीका आणि विरोध करत असतात. मात्र माझ्यात तो विरोधाचा अर्कच वेगळा असून तो आतापर्यंत विरोधात राहील्याने आला असल्याचे त्यांनी सांगितले.

गुजरातमधील विधानसभेच्या निवडणूकीत सुरुवातीला काँग्रेसने राष्ट्रवादीला सोबत घेण्याचे नाकारले. त्यामुळे आम्ही स्वतंत्रपणे निवडणूका लढविल्या. तरीही आमच्या पक्षाच्या उमेदवारांना चांगली मते मिळाली असून दोन्ही पक्षानी आघाडी करून निवडणूका लढविल्या असत्या तर चित्र वेगळे दिसले असते. त्याचबरोबर ज्याला पप्पु म्हटले जात होते. त्याच व्यक्तीने त्यांच्या गुजरातमध्ये जावून त्यांचे नीटनेटके केल्याचे मान्यच करावे लागेल असे सांगत राहुल गांधी यांचे नेतृत्व सर्वमान्य असल्याचे त्यांनी यावेळी मान्य केले.

त्याचबरोबर आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आघाडीच्या दृष्टीकोनातून चर्चा सुरु झाली आहे. गतवेळच्या निवडणूकीत काँग्रेसला १७.४३ टक्के मते तर राष्ट्रवादीला १७.८८ मते मिळाली असल्याने निवडणूकीतील जागावाटप समसमान अर्थात ५०-५० टक्के स्वरूपात असावे अशी राष्ट्रवादीची भूमिका असल्याचे धनंजय मुंडे यांनी शेवटी सांगितले.

Exit mobile version