Marathi e-Batmya

केजरीवाल आणि भाजपाच्या वक्तव्यावर नाना पटोलेंची टीका, आधी रूपया सांभाळा

सध्या संपूर्ण देशभरात दिवाळीचा उत्साह आहे. तसेच तब्बल दोन वर्षानंतर कोरोनामुक्त दिवाळी साजरी करण्यात येत आहे. मात्र राजकिय क्षेत्रात कधी कधी बेताल वक्तव्ये करून खळबळ माजवून देणारे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज पत्रकार परिषद घेत नव्या नोटांवर लक्ष्मी आणि गणपतीचा फोटो छापण्याची मागणी केंद्राकडे मागणी केली. तसेच नोटांवर महात्मा गांधींचा फोटो तसाच ठेवत दुसऱ्या बाजूला लक्ष्मी आणि गणपतीचा फोटो छापला पाहिजे अशी सूचनाही केली. अरविंद केजरीवाल यांच्या या मागणीची भाजपाने खिल्ली उडविली. मात्र केजरीवाल आणि भाजपाच्या वक्तव्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी टीका केली.

यावेळी बोलताना नाना पटोले म्हणाले की, केंद्र सरकार आणि केजरीवाल दोघे मिळून देशाला फसवत असल्याची टीका केली.

आपल्याला माहिती आहे, की देशाचा रुपया संपायला आलेला आहे. मात्र, आज ज्या पद्धतीने रुपयांची घसरण सुरू आहे, ती वाचवणं गरजेचं आहे. ही मागणी ज्या व्यक्तीने केली आहे. ती व्यक्ती उच्चशिक्षित आहे. त्यांना या विषयाची जाण आहे. मात्र, मतांच्या राजकारणासाठी यापद्धतीने मागणी करत धार्मीक वाद निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे. एकंदरीत केंद्र सरकार आणि केजरीवाल देशवासियांची फसवणूक करत आहेत, अशी टीका त्यांनी केली.

दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत नव्या नोटांवर महात्मा गांधींसह लक्ष्मी आणि गणपतीचा फोटो छापण्याची मागणी केली होती. दिवाळीच्या रात्री पूजा करताना आपल्या मनात हा विचार आला असून अनेकांशी आपली याबाबत चर्चा झाली आहे. कोणीही त्यावर आक्षेप घेण्याचं कारण नाही. अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी आणि देशाला विकसित करण्यासाठी आपल्याला देवी-देवतांचे आशीर्वाद हवे आहेत, असे सांगितले.

त्यावर भाजपाचे संबित पात्रा म्हणाले की, पूजा करायच्या आधी आम्ही स्वास्तिकचे चिन्ह काढतो आणि टीका लावतो. त्यानंतर आम्ही देवांचे आशिर्वाद घेण्यासाठी पूजा करतो. परंतु केजरीवाल यांनी ढोंग बंद करावे आणि देवी देवतांचा अपमान करणे बंद करावे असे सांगत खिल्ली उडविली.

Exit mobile version