Marathi e-Batmya

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे ना टेंडर ना वर्क ऑर्डर

मुंबई : प्रतिनिधी

२०१५ मध्ये बिहारच्या निवडणूका डोळयासमोर ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईतील इंदू मिलमधील बाबासाहेबांच्या स्मारकाचे भूमिपूजन केले होते. तीन वर्षात हालचाल होत नाही…स्मारकाचे डिझाईन फायनल होत नाही…टेंडर काढण्यात येत नाही…वर्क ऑर्डर निघत नाही… ६ डिसेंबर आले म्हणून एखादया अधिकाऱ्याला न्यायचे आणि खोदकाम सुरु करायचं आणि लोकांची दिशाभूल करण्याचे काम सरकार करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला.

६ डिसेंबर असेल किंवा १४ एप्रिल असेल त्यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या कामाचे खोदकाम फक्त करण्यात येते. त्याव्यतिरिक्त तीन वर्षात काहीच काम स्मारकाचे झाले नसल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

खरंतर यांना इंदू मिल जागेवर बाबासाहेबांचे स्मारक बांधावयाचे आहे का ? हे स्पष्ट होत नाही. पंतप्रधानांनी तीन वर्षापूर्वी भूमिपूजन केले. निवडणूकीमध्ये फायदा मिळवण्यासाठी भूमिपूजन सोहळा आयोजित करण्यात आला होता. तरीही तीन-तीन वर्ष स्मारकाचं काम होत नाही. देशभरातील दलित भाजपविरोधात आहे असे चित्र दिसतेय. त्यामुळे हे काम अडकवून ठेवण्याचा डाव भाजपचा किंवा सरकारचा आहे का हे सरकारने स्पष्ट करावे अशी मागणीही त्यांनी केली.

दरम्यान मुंबईतील इंदू मिलमधील डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे काम तात्काळ सुरु करण्यात यावे अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली आहे.

Exit mobile version