Marathi e-Batmya

महाविकासच्या मंत्री, आमदारांवर उपमुख्यमंत्री कार्यालयाचे लक्ष

मुंबईः विशेष प्रतिनिधी

राज्यात शिवसेनेच्या नेतृत्वाखाली काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र विकास आघाडी सरकार सत्तेवर येवून चार महिने झाले. मात्र संख्याबळात तुकड्यांनी असल्याचा गैरफायदा भाजपाने घेवू नये यासाठी आघाडीच्या सर्व आमदार, मंत्र्यांवर विधानसभा आणि विधान परिषदेतील हजेरीवर धास्तावलेल्या उपमुख्यमंत्री कार्यालय अर्थात अजित पवार यांच्याकडून बारीक लक्ष ठेवण्यात येत असल्याची माहिती उपमुख्यमंत्री कार्यालयातील विश्वसनीय सूत्रांनी दिली.

विधानसभेत पक्षीय बलाबलाच्या तुलनेत भाजपाकडील संख्याबळ सर्वात जास्त आहे. त्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचा नंबर लागतो. परंतु सर्वाधिक संख्याबळ भाजपाकडे असूनही त्यांना सत्तेबाहेर रहावे लागण्याची पाळी आली. मात्र महाविकास आघाडीत तिन्ही पक्षांचे मिळून १६९ संख्याबळ आहे. त्यामुळे एखाद्या विधेयकाच्या मंजूरी वेळी किंवा चर्चेच्या वेळी भाजपाकडून मतदानाची मागणी करण्यात आली तर सरकारवर भलतीच नामुष्की येण्याची पाळी येवू शकते. त्यामुळे तिन्ही पक्षांच्या आमदारांना सभागृहात चालणाऱ्या प्रत्येक कामकाजावेळी हजर राहण्यास सांगण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

त्यानुसार सकाळच्या सत्रात किती आमदार आणि कोण कोण हजर होते, किती जणांनी कामकाजात सहभाग घेतला, किती जणांनी हजेरी लावली यासंदर्भात माहिती घेण्यात येत आहे. तसेच आमदारांच्या हजेरी पुस्तिकेबरोबरच उपमुख्यमंत्री कार्यालयाकडून एक नोंदवही ठेवण्यात आली असून त्यावर आघाडीच्या आमदारांना सभागृहात प्रवेश करताना सही करणे बंधनकारक करण्यात आल्याचे त्यांनी शेवटी सांगितले.

Exit mobile version